Bihar Politics : बिहारमध्ये जेडीयू, आरजेडीचं ठरलं… उद्या दुपारी 2 वाजता शपथविधी, 7 पक्षांच्या महाआघाडीचं सरकार स्थापन होणार

| Updated on: Aug 09, 2022 | 8:31 PM

164 आमदारांच्या समर्थनाचं पत्रही नितीश कुमार यांनी राज्यपालांना दिलं. त्यानुसार आता बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन उद्या सरकार स्थापन होणार आहे. उद्या (10 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

Bihar Politics : बिहारमध्ये जेडीयू, आरजेडीचं ठरलं... उद्या दुपारी 2 वाजता शपथविधी, 7 पक्षांच्या महाआघाडीचं सरकार स्थापन होणार
Follow us on

मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde Fadnavis Government) शपथविधी सुरु असताना, दुसरीकडे बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेडने भाजपसोबतची युती तोडली. निताश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. इतकंच नाही तर तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय जनता दल आणि अन्य सहा पक्षांसोबत महाआघाडी करत नवं सरकार स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यानुसार नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी राजभवनावर जात राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावेळी 164 आमदारांच्या समर्थनाचं पत्रही नितीश कुमार यांनी राज्यपालांना दिलं. त्यानुसार आता बिहारमध्ये जदयू, राजद, काँग्रेस आणि अन्य स्थानिक पक्षांना सोबत घेऊन उद्या सरकार स्थापन होणार आहे. उद्या (10 ऑगस्ट) दुपारी 2 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.

‘भाजपसोबत होतो तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळला’

नितीश कुमार यांनी 164 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवलं आहे. राज्यपालांना आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवल्यानंतर नितीश कुमार म्हणाले की 2017 ला आमच्याकडून चूक झाली. तत्पूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार राबडी देवी यांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथे त्यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासोबत बैठक केली. जोपर्यंत आम्ही भाजपसोबत होतो तोपर्यंत आम्ही युती धर्म पाळला. आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या सहमतीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे. आमच्या सर्वच नेत्यांची इच्छा होती की भाजपपासून वेगळं व्हावं, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिल.

तेजस्वी यादवांचा भाजपवर हल्लाबोल

बिहारने देशाला दिशा दाखवली आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला नाही. आज संविधान वाचवायचं आहे. जो विकला जातो त्याला विकत घ्या, हेच भाजपचं काम आहे. मुख्यमंत्र्यांनी देश हिताचा निर्णय घेतलाय. आम्ही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो, अशा शब्दात तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्ला चढवला. तसंच नितीश कुमार यांच्याशी असलेल्या संबंधांबाबत विचारलं असता तेजस्वी यादव म्हणाले की, आम्ही काका-पुतणे आहोत. आम्ही एकमेकांविरोधात लढलो, आरोप प्रत्यारोप केले. प्रत्येक कुटुंबात वाद होतात. आता दुसरी वेळ आहे. नितीश कुमार देशात सर्वाधिक अनुभवी मुख्यमंत्री आहेत.