राजकारणातून मोठी बातमी! भाजपने 3 माजी खासदार फोडले; थेट पक्षप्रवेशाने देशात खळबळ
Trinamool Congress : पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन खासदारांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या निवडणुकीपूर्वी बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे.

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. तृणमूल काँग्रेसच्या तीन खासदारांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. अशातच आता टीएमसीचे माजी राज्यसभा खासदार सुखेंदू शेखर रॉय, प्रकाश चिक बडाईक आणि सुष्मिता देव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी या पक्ष प्रवेशाबाबत सांगितले की, या तिन्ही खासदारांनी यापूर्वीच टीएमसीचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भय आउट, भरोसा इन या घोषवाक्यासह भाजपने निवडणूक लढवली आणि जनतेने त्याला पाठिंबा दिला. या राज्यसभा खासदारांची संसदीय कामगिरी चांगली होती आणि हे सर्वांनाच माहीत आहे. पंतप्रधानांनी देशवासीयांसमोर पश्चिम बंगालला विकासाच्या मार्गावर एकत्र नेण्याचा संकल्प व्यक्त केला असून, त्याच उद्देशाने या खासदारांनी भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिला होता राजीनामा
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या तिन्ही खासदारांनी टीएमसीचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर सुष्मिता देव यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता या तिघांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
बंगालला वाळवंट बनवले – सुखेंदू शेखर रॉय
भाजपमध्ये प्रवेश करताना माजी खासदार सुखेंदू शेखर रॉय म्हणाले की, मागील सरकारने पश्चिम बंगालला विकासापासून दूर ठेवले. एकेकाळी देशाला दिशा देणारा बंगाल घोटाळ्यांनी ग्रासला होता. या परिस्थितीत राज्यातील जनतेने भाजपला संधी देण्याचा निर्णय घेतला. टीएमसीतील अनेक लोक राजकारणाशी बांधिलकी असलेले नव्हते. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यांत आरजी कर प्रकरणाच्या विरोधात राज्यातील जनता रस्त्यावर उतरली होती. इतर राज्ये विकासासाठी केंद्र सरकारकडे जातात, मात्र बंगालमधील सरकारचे एकमेव उद्दिष्ट केंद्र सरकारला विरोध करणे हेच होते. त्यामुळे रोजगाराच्या शोधात तरुण मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेर जात असून, बंगाल वृद्धाश्रमासारखा बनला आहे.
टीएमसीमध्ये तळागाळापर्यंत भ्रष्टाचार – सुष्मिता देव
सुष्मिता देव म्हणाल्या की, आसाममध्ये ज्या प्रकारे मूलभूत सुविधा विकसित झाल्या आहेत, त्या अभूतपूर्व आहेत. मी टीएमसीमध्ये प्रवेश केला तेव्हा पक्षाचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा उद्देश होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे करिष्माई नेतृत्व इतर कोणाकडेही नाही. मी दीदींना साधी सूती साडी आणि हवाई चप्पल घातलेल्या पाहिल्या होत्या. पण नंतर पक्षात ज्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळाला, तो कल्पनेपलीकडचा होता. तळागाळापर्यंत भ्रष्टाचार पसरलेला आहे.’