
बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीत बीएनपी (BNP) चा ऐतिहासिक विजय झाला आहे. बांगलादेशमध्ये बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टीला दणदणीत यश मिळालं. दरम्यान बांगलादेशमध्ये सत्तेत आल्यानंतर आता बीएनपीकडून भारतासंदर्भात मोठं विधान करण्यात आलं आहे, पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, यामुळे पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेशमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशमध्ये पाठवण्याचा मुद्दा आम्ही भारतासमोर उपस्थित करू असं बीएनपीने म्हटलं आहे. बीएनपीचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दीन अहमद यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर प्रतिक्रिया देतान हे वक्तव्य केलं आहे. आम्ही भारत सरकारला असं आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावं, त्यानंतर त्या आपली न्यायालयीन लढाई लढतील, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना सलाहुद्दीन अहमद यांनी असं देखील म्हटलं आहे की, शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी आम्ही भारतावर दबाव टाकू, आम्ही भारत सरकारला असं आव्हान करू की त्यांनी शेख हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावं. शेख हसीना या बांगलादेशमध्ये आल्यानंतर आपली न्यायालयीन लढाई लढतील. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमधील हा प्रश्न आहे, आम्ही त्यावर पुढील काळात काम करू असंही यावेळी सलाहुद्दीन यांनी म्हटलं आहे.
तणाव वाढणार?
दरम्यान बीएनपीचे नेता सलाहुद्दीन यांनी शेख हसीना यांच्याबद्दल केलेलं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सलाहुद्दीन यांचा पक्ष आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करणार आहे. तारिक रहमान यांच्यापूर्वी बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचं जे काळजीवाहू सरकार होतं, त्यांची देखील हीच भूमिका होती, त्यांनी देखील शेख हसीना यांचं प्रत्यार्पण करावं अशी मागणी केली होती. दरम्यान आता सत्तेत येताच बीएपीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, त्यामुळे आता तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र आता हा कळीचा मुद्दा बणण्याची शक्यता आहे.