‘FRP’बाबत मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लाभ…

| Updated on: Jun 28, 2023 | 5:31 PM

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे उत्पादन होते. तर या जिल्ह्यात उसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 962.12 क्विंटल असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यावर्षी संपूर्ण देशात साखरेचे उत्पादन 35.76 दशलक्ष टनांवरून 32.8 दशलक्ष टनांवर आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.

FRPबाबत मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार लाभ...
Follow us on

नवी दिल्ली : ऊस शेती करणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. केंद्र सरकारने कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कास्ट्स अँड प्राइजच्या शिफारशीनुसार उसाचा एफआरपी वाढवण्याच्या निर्णयावर हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. खास करुन उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. केंद्राच्या कॅबिनेटच्या बैठकीत उसाचा एफआरपी वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. उसाच्या एफआरपीमध्ये 10 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे उसाच्या एफआरपीमध्ये 305 वरून वाढ होऊन 315 रुपयांची वाढ प्रतिक्विंटलमागे होणार आहे. विशेष करुन या वर्षीच्या ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या गळीत हंगामापासून हा निर्णय लागू होणार आहे.

एफआरपी वाढवण्याचा निर्णय

त्यामुळे सरकारने घेतलेला हा निर्णय अनेक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असला तरी विरोधकांनी हा निर्णय घेण्यामागे राजकारण असल्याचे म्हटले आहे. कारण आगामी काळात काही राज्यातील निवडणुका होत आहेत, त्याच धर्तीवर हा निर्णय घेतला असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे एफआरपी वाढवण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशबरोबरच काही राज्यातील शेतकऱ्यांनाही याचा फायदा मिळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्राला फायदा

उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी आहेत. उत्तर प्रदेशातील लाखो शेतकरी ऊस उत्पादक आहेत. मागील वर्षी म्हणजेच 2022-23 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये 28.53 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती. तर त्याच प्रमाणे महाराष्ट्रातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या असून या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातीलही लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्रातही मागील वर्षी 14.9 लाख हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड करण्यात आली होती. त्यामुळे भारतात 62 लाख हेक्टरच्यावर ऊस लागवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

साखरचे उत्पादन वाढले

उत्तर प्रदेशात साखर कारखान्यांची संख्या 119 पेक्षा जास्त असून 50 लाखापेक्षा जास्त ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तर यंदा उत्तर प्रदेशात 1102.49 लाख टन उसाचे उत्पादन झाले आहे. तर साखर कारखान्यांनी 1 हजार 99.49 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून कारखान्यांनी 105 लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश अव्वल

या प्रकारे उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात सर्वाधिक उसाचे उत्पादन होते. तर या जिल्ह्यात उसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी 962.12 क्विंटल असल्याचे सांगण्यात आले आहे. तर यावर्षी संपूर्ण देशात साखरेचे उत्पादन 35.76 दशलक्ष टनांवरून 32.8 दशलक्ष टनांवर आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.