काँग्रेस भाजपमय होतेय? मुख्यमंत्री, मंत्री चक्क पक्षाच्या कामाला, वाचा सविस्तर

| Updated on: Jan 07, 2021 | 6:00 PM

काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना आगामी काळातील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. (Congress Chief Ministers)

काँग्रेस भाजपमय होतेय? मुख्यमंत्री, मंत्री चक्क पक्षाच्या कामाला, वाचा सविस्तर
नितीन राऊत सोनिया गांधी अशोक गेहलोत
Follow us on

नवी दिल्ली: 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासून सातत्यानं पराभवाला तोंड द्यावं लागलेलं काँग्रेस (Congress) आता भाजपच्या (BJP) वाटेनं जात असल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना आगामी काळातील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. 2021 मध्ये निवडणुका असलेल्या राज्यांची जबाबदारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. यंदा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामची निवडणूक होणार आहे. (Congress appoint Chief Ministers as observers for Assembly Election this year)

मुख्यमंत्र्याकडे पर्यवेक्षक पदाची अतिरिक्त जबाबदारी

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Bagel) यांच्यासह मुकूल वासनिक, एम वीरप्पा मोईली, एमएम पल्लम राजू लुईजिन्हो फलेरियो, डॉ. नितीन राऊत, बीके हरिप्रसाद, विजय इंदर सिंगला यांच्यासह इतर नेत्यांना आगामी निवडणुकांच्या पर्यवेक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अशोक गेहलोत यांच्याकडे केरळची जबाबदारी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडे केरळ राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशोक गेहलोत यांच्यासोबत लुइजिन्हो फ्लोरियो आणि जी परमेश्वर हे देखील केरळची जबाबदारी सांभाळतील. केरळमध्ये काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. इथं काँग्रेसला डाव्या पक्षांचं आव्हान आहे.

आसामची जबाबदारी भूपेश बघेल यांच्यावर

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर आसामाची जबाबदारी देण्यात आली आहे. भूपेश बघेल यांच्या जोडीला मुकूल वासनिक आणि शकील अहमद असणार आहेत. आसाममध्ये काँग्रेसपुढे भाजपचं आव्हान आहे. गेली पाच वर्षे आसाममध्ये भाजप सत्तेत आहे.

पश्चिम बंगालची धुरा बीके हरिप्रसाद यांच्यावर

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममत बॅनर्जी ( Mamata Banarjee) पश्चिम बंगालमध्ये दोन टर्म मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत. काँग्रेस येथेही विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. मात्र, भाजपनं मिशन पश्चिम बंगाल सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालची जबाबदारी बीके हरिप्रसाद, आलमगीकर आलम आणि विजय इंदर सिंगला यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

तामिळनाडू आणि पाँडिचेरी

तामिळनाडूमध्ये सध्या जयललिता यांच्या अण्णा द्रमुक यांच्या पक्षाची सत्ता आहे. काँग्रेसचा या राज्यामध्ये द्रमुक सोबत युती करण्याचा प्रयत्न राहण्याची शक्यता आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील दोन मोठे नेते जयललिता आणि करुणानिधी यांचे निधन झाल्यामुळे अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांची धुरा त्यांच्या राजकीय वारसदारांकडे आलेली आहे. तामिळनाडूच्या पर्यवेक्षकपदी महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री नितीन राऊत, एम. विरप्पा मोईली, एमएम पल्लम राजू यांची निवड करण्यात आली आहे. पाँडिचेरीमध्ये काँग्रेस सत्तेत आहे.

काँग्रेसचं भाजपच्या पुढचं पाऊल

राज्यांच्या निवडणुका असल्यातर भाजप त्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवते. काँग्रेसनं तर भाजपच्या पुढचं पाऊल टाकत निवडणुकांच्या पर्यवेक्षक पदांची जबाबदारी सोपवली आहे.

महाराष्ट्राच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी

केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यावर केंद्रीय नेतृत्वानं पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. त्यांच्याकडे तामिळनाडू आणि पाँडिचेरीची जबाबदारी देण्यात आलीय. तर, मुकूल वासनिक यांच्यावर आसामची जबाबदारी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, बिहारमध्ये 19 पैकी 11 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

बिहारमध्ये काँग्रेसला अजून मोठा झटका बसण्याची शक्यता, काय आहे कारण?

(Congress appoint Chief Ministers as observers for Assembly Election this year)