मोठी बातमी ! खासदारकी गेली आता बेघर होणार?, राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस; काय आहे नोटिशीत?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या अडचणी अजूनही काही कमी झालेल्या नाहीत. राहुल गांधी यांना आता सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.

मोठी बातमी ! खासदारकी गेली आता बेघर होणार?, राहुल गांधी यांना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस; काय आहे नोटिशीत?
rahul gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 27, 2023 | 6:38 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं लोकसभेचं सदस्यत्व गेल्यानंतर काँग्रेससाठी आणखी एक वाईट आणि धक्कादायक बातमी आहे. राहुल गांधी यांना आता सरकारी बंगला सोडावा लागणार आहे. त्यांना तशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आपलं बिऱ्हाड दुसरीकडे हलवावं लागणार आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा दुसरा धक्का आहे. तर खासदारकी गेल्यानंतर राहुल गांधी यांना आता बेघर व्हावं लागणार असल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकसभा आवास समितीने राहुल गांधी यांना ही नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना देण्यात आलेला सरकारी बंगला सोडण्यात सांगण्यात आलं आहे. राहुल गांधी संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांना बंगला खाली करण्याचे निर्देश या नोटिशीतून देण्यात आले आहेत. राहुल गांधी सध्या 12 तुघलक लेन येथील सरकारी बंगल्यात राहत आहेत. त्यांना 30 दिवसात म्हणजे 22 एप्रिलपर्यंत बंगला खाली करण्यास सांगण्यात आले आहे. या नोटिशीवर राहुल गांधी काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी नोटिशीला उत्तर देऊन बंगला खाली करण्यासाठी वेळ मागून घेतात की स्वत:हून बंगला सोडतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कधीपासून बंगला मिळाला

राहुल गांधी यांना 12 तुघलक लेनमधील सरकारी बंगला 2004मध्ये मिळाला होता. 2004मध्ये ते पहिल्यांदा अमेठीतून विजयी झाले होते. तेव्हापासून त्यांना हा बंगला देण्यात आलेला आहे.

पर्याय काय?

राहुल गांधी यांना 30 दिवसात बंगला खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. राहुल गांधी जास्तीत जास्त सहा महिने या बंगल्यात राहू शकतात. त्यासाठी त्यांना कमर्शियल रेंट द्यावं लागणार आहे. त्यासाठी त्यांना लोकसभेच्या आवास समितीला पत्र लिहून बंगला राहण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी करावी लागणार आहे.

ब्लॅक ड्रेस प्रोटेस्ट

दरम्यान, राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याने काँग्रेसमध्ये संतापाचं वातावरण आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज संसदेत काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला. अदानी प्रकरण आणि राहुल गांधी प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज काही तासांसाठी तहकूब करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात कर्नाटकात एक रॅली केली होती. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना नीरव मोदी, ललित मोदी यांच्याशी केली होती. सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात, असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता. त्यामुळे भाजपचे गुजरातचे आमदार पूर्णेश मोदी यांनी सुरत कोर्टात याचिका दाखल केली होती. मोदी समुदायाचा अपमान झाल्याचं सांगत त्यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यावर कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यामुळे संसदेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us