ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा; संजय राऊत संतापले

| Updated on: Jul 21, 2021 | 10:33 AM

ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. (sanjay raut)

ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा; संजय राऊत संतापले
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us on

नवी दिल्ली: ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावले नसल्याचं लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलं आहे. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे. (covid patients relatives should file case against government: sanjay raut)

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झाले नाहीत, असं केंद्र सरकारने लेखी उत्तरात म्हटलं आहे. हे तुम्हाला पटतं का?, असा सवाल राऊत यांना केला. त्यावर राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. तुमचाही खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी चढवला.

गंगा खोटे बोलते काय?

काल पंतप्रधान वाराणासीत गेले होते. सर्व काही अलबेल असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजूलाच गंगा वाहते. सर्वात जास्त प्रेत गंगेत वाहत होते. म्हणून मी काल त्यांना संसदेत विचारलं, गंगा खोटे बोलते का? काल जे अराजक माजले त्यात ऑक्सिजन अभावी लोक मेले हे सत्य आहे. सरकारने सत्यापासून पळ काढू नये, असंही राऊत म्हणाले.

तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकार सज्ज

केंद्र सरकार देशातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्लांट उभारलणार आहे. ही चांगली गोष्ट आहे. त्याचीच काल बैठक होती. त्यात ऑक्सिजन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठीचं सादरीकरण करण्यात आलं. काल ज्या पद्धतीने सादरीकरण झालं त्यावरून तिसऱ्या लाटेशी मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार तयारी करत आहे असं दिसलं, असं सांगतानाच राजकीय श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला केला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. ते खरं आहे. कारण राष्ट्रीय आपत्ती असल्याचं म्हणतो तर आपण एकत्र काम केलं पाहिजे. महाराष्ट्र आणि केरळ सर्वात जास्त कोरोनाशी संघर्ष करत आहे. कोरोना संख्या वाढत असताना महाराष्ट्राने कालच्या बैठकीवर बहिष्कार टाकावं हे योग्य वाटत नव्हतं. त्यामुळेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि आम्ही भूमिका घेतली की आपण बैठकीला बसलं पाहिजे. त्यामुळे आम्ही बैठकीला गेलो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उठसूठ केंद्रावर हल्ले करणं योग्य नाही

संपूर्ण मंत्रिमंडळ सादरीकरणाला होते. कोरोनाशी संबंधित सर्व मुद्दे त्यात आले. त्यात सुधारणा होत आहेत. केंद्रावर उठसूठ हल्ले करणं योग्य नाही. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. महाराष्ट्राला त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे आपण केंद्राच्या सहकार्याने काम केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं.

आमचं काय चुकलं?

पेगाससच्या मुद्द्यावरूनही त्यांनी भाजपला घेरलं. आज भाजप विरोधी पक्षात असती आणि त्यांनी ज्या मागण्या केल्या असत्या त्याच आम्ही करत आहोत. भाजपनेही जेपीसीची मागणी केली असती. त्यांनी या पूर्वीही अशी मागणी केली आहे. आम्ही मागणी केली त्यात चुकलं काय?, असा सवाल त्यांनी केला. (covid patients relatives should file case against government: sanjay raut)

 

संबंधित बातम्या:

गंगेच्या किनारी मृतदेहांची विटंबना, महाराष्ट्र मॉडेल लागू करणार का, संजय राऊत गरजले, भारती पवारांचं संयमी उत्तर

आधी राहुल गांधींची भेट, मग नाना पटोलेंची दिल्लीत मोठी घोषणा, महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी शड्डू ठोकला

मुंबईचे अहमदाबाद करण्याचा डाव, विमानतळाच्या मुख्यालयासाठी आक्रमक भूमिका घेऊ; विनायक राऊतांचा इशारा

(covid patients relatives should file case against government: sanjay raut)