रायपूर : दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यामध्ये 11 जवान शहीद झाले. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दल (DRG) दलाच्या वाहनावर IED स्फोटांनी हा हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर जे जिवंत राहिले आहे, ते अस्वस्थ आहेत. आपण जिवंत राहिल्याच्या घटनेवर त्यांचा विश्वास बसत नाही. या घटनेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुटखा खाण्याच्या सवयीमुळे सात जवानांचे प्राण वाचल्याचे स्पष्ट झाले आहे.
कसे वाचले प्राण
बुधवारी अरणपूरहून राज्याच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालयाकडे परतत असताना, सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला. यावेळी दुसर्या वाहनाच्या चालकाने आपले वाहन, त्या वाहनाच्या मागे कसे पडले हे सांगितले. त्या चालकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर माहिती दिली. त्याने सांगितले की, मला गुटखा खाण्याची सवय आहे. गुटखा चघळण्यासाठी मी गाडीचा वेग कमी केला. तेव्हा मागून येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाने माझे वाहन ओव्हरटेक केले आणि काही अंतरावर त्याचा स्फोट झाला. या घटनेत त्या वाहनाचा चक्काचूर झाला.
असा झाला स्फोट
वाहन चालकाने सांगितले की, माझे वाहन ताफ्यात दुसऱ्या क्रमांकावर होते. गाडीत सात सुरक्षा कर्मचारी प्रवास करत होते. गुटखा चघळण्यासाठी मी जेव्हा माझ्या वाहनाचा वेग कमी केला. त्यानंतर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून आम्ही सुमारे 200 मीटर अंतरावर होतो. दरम्यान आमच्या मागून आलेल्या वाहनाने आम्हाला ओव्हरटेक केले आणि काही अंतर गेल्यावर अचानक स्फोट झाला. मला वाटते आमचे वाहन लक्ष्य होते पण देवाने आम्हाला वाचवले. या घटनेनंतर त्याच्या वाहनातील सात जवानांनी खाली उडी घेतली. त्यांनी रस्त्याच्या कडेला पोझिशन घेतली. जंगलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला.
अन् सुरु केला गोळीबार
स्फोटामुळे धूळ आणि धुराचे ढग निर्माण झाले. ते दूर होण्यापूर्वी माझ्या वाहनातील सर्व जवानांनी आणि मी उडी मारली. सुरक्षा दलाच्या जवानांनी रस्त्याच्या कडेला जागा घेतली आणि नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
एसओपीचे पालन झाले नव्हते
गुप्तचर विभागाने या भागात नक्षली असल्याचा संदेश दिला होता. त्यानंतर एसओपीचे पालन झाले नाही. त्यामुळे नक्षलींना संधी मिळाली. एसओपीनुसार जवान एक गाडी जाऊ शकत नाही. ऑपरेशन दरम्यान त्यांना पायीच जावे लागते. परंतु कोबिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आणि जवान गाडीत गेले. यावेळी २५० जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्या करण्यात आल्या. त्यातील एका तुकडीवर हा हल्ला करण्यात आला. दरम्यान हा हल्ला झाला तेव्हा एसओपीचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे.