गुंडागर्दी नही चलेगी… जंतरमंतरवर आंदोलन पेटलं; अनेकांची धरपकड सुरू
जंतरमंतरवर पुन्हा युवकांचे आंदोलन पेटले आहे. 'गुंडागर्दी नही चलेगी' घोषणांनी परिसर दणाणला. राहुल-प्रियंका गांधींच्या उपस्थितीमुळे आंदोलन अधिक तीव्र झाले, तर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर सुरू झालेल्या या आंदोलनाला आता राजकीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत आहे.

जंतरमंतरवर पुन्हा एकदा तरुणांनी एल्गार पुकारला आहे. कालचं आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. गुंडागर्दी नही चलेगी…च्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने आंदोलक पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे वातावरण पुन्हा तापलं.
गेल्या 23 दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतरमंतरवर सुरू आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण मोडीत काढल्याने आंदोलक काल अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अनेक विद्यार्थी या आंदोलनात जखमी झाले. मुलींनाही प्रचंड मार लागला. अनेकांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे जंतरमंतरवरची परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
अन् आंदोलकांना पांगवलं…
संध्याकाळी या आंदोलकांना पांगवण्यात आलं होतं. आंदोलकांना पांगवल्यानंतर परत रात्री आंदोलक जंतरमंतरवर आले. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात काल पुन्हा आंदोलन सुरू झालं. रात्रभर हे आंदोलन सुरू होतं. आज सकाळीही आंदोलन सुरू होतं. पण दुपारनंतर हे आंदोलन अधिकच पेटलं. दुपारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आंदोलनस्थळी आले. त्यांनी मोदींच्या निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्याचवेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनस्थळी येऊन अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला.
तरीही घोषणा सुरूच…
राजकीय नेत्यांनी आंदोलन स्थळी धाव घेतल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारला प्रचंड धारेवर धरलं. गुंडागर्दी नही चलेगी, तानाशाही नही चलेगीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तरुणांना व्हॅनमध्ये कोंबल्यानंतरही त्यांच्या घोषणा सुरूच होत्या.