हे सरकारच दहशतवादी, 4 वर्ष तुमची मारतात अन् 1 वर्ष…, अमित ठाकरेंचा लाठीचार्जनंतर संताप
दिल्लीमध्ये सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा विरोधी पक्षांकडून निषेध करण्यात येत आहे. यावर आता मनसे नेते अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. सोमवारी आंदोलकांनी संसदेवर मोर्चा काढला, त्यानंतर पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, आश्रुधुराचा मारा करण्यात आला, त्यामुळे देशभरात चांगलंच वातावरण तापलं. दरम्यान आता या आंदोलनाला विरोधकांकडून पाठिंबा मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील जंतर मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांची भेट घेतली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मनसे नेते अमित ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?
पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जावरून अमित ठाकरे यांनी सरकावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आम्ही दिल्लीला गेलेलो होतो, तेव्हा कळलं 5 -6 लोक सिव्हिलमध्ये आले पांढरा कपड्यात गुंडाळून सोनम वांगचूक यांना घेऊन गेले, त्यांना यात लोकशाही दिसते का? तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची इच्छा का झाली नाही? असा सवाल यावेळी अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी अभिजित दिपकेला भेटलो. त्याच्याकडून माहिती घेतली. कालचा दिवस हा आपल्या देशाच्या राजकारणातला सर्वात काळा दिवस होता. सत्तेचा माज आलाय या लोकांना. त्यांनी लाठी चार्ज केला, दिल्लीचा पण व्हिडीओ बघितला, त्यांनी काठीत खिळे घुसवले होते असा आरोप यावेळी अमित ठाकरे यांनी केला आहे.
नीटच्या पेपरफुटीमुळे हे सर्व सुरु आहे. मुलींवर पोलीस काठ्या उचलतात, पोलीस भाजपचे आहेत की जनतेचे? नीच राक्षसी प्रकारचं राजकारण चालू आहे, मला आश्चर्य वाटायत सरकार असं वागतंय, येत्या कळत 3 वर्षात काय परिस्थिती असेल माहिती नाही, पण लक्ष ठेवा 4 वर्ष तुमची मारतात आणि 1 वर्ष तुमच्या प्रेमात असतात. हे सरकारच दहशतवादी आहे, हा विषय देशभर पेटणार असं यावेळी अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे.
