धर्मेंद्र प्रधान पुन्हा एक्शन मोडमध्ये, राजीनामा देताच… काँग्रेसचा बडा नेता टार्गेटवर
Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ते प्रथमच संसदेत पोहोचले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला सुनावलं आहे.

देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. नीट पेपर लीक प्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर आज प्रथमच संसदेत पोहोचले. यावेळी भाजप आणि एनडीएच्या खासदारांनी त्यांचे भव्य स्वागत करत त्यांना पगडी घालत संसद भवनात नेले. यावेली काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी प्रधान यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
संसद भवन परिसरात काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी प्रधान यांच्याशी सहानुभूती व्यक्त करत, ‘असं होत असतं’ असं म्हटलं. त्यावर धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ उत्तर दिलं, “काहीच झालेलं नाही”. त्यानंतर त्यांनी पुढे म्हटले की ‘मी रस्त्यावर संघर्ष करणारा नेता आहे, एसी रूममध्ये बसून आंदोलन करणारा कार्यकर्ता नाही’. प्रधान यांच्या राजकीय भवितव्याबाबत विविध तर्क-वितर्क सुरू असतानाच त्यांनी विरोधकांना हे प्रत्युत्तर दिले आहे.
पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा
मंत्रिमंडळातून बाहेर पडल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी त्यांच्याकडे प्रचार मोहिमेचे नेतृत्व दिले जाऊ शकते. प्रधान यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की, प्रधान यांनी देशहितासाठी आपल्या पदाचा त्याग केला आहे. त्यामुळे जनतेमध्ये आणि त्यांच्या संबलपूर मतदारसंघात त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होईल.’
शनिवारी X वर पोस्ट केलेल्या निवेदनात धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले होते, ‘गेल्या दहा दिवसांत घडलेल्या घटनांमुळे मला दुःख झाले आहे. हा माझ्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. भारताची युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद आहे. देशातील तरुणांना संभ्रमाच्या दुष्टचक्रात अडकू देणार नाही, हा माझा निर्धार आहे.”
धर्मेंद्र प्रधान याचे पक्षासाठी योगदान
धर्मेंद्र प्रधान हे ओडिशातील भाजपचे आघाडीचे नेते असून राष्ट्रीय राजकारणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून काम केले होते. तसेच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्या विरोधात सुवेंदू अधिकारी यांच्या विजयातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.