गेहलोतांचा गेम झाला आणि दिग्विजय सिंह दिल्लीसाठी पुन्हा ॲक्टिव्ह झाले…

| Updated on: Sep 28, 2022 | 5:43 PM

अशोक गेहलोत, शशी थरुर यांची नावं चर्चेत असतानाच आता दिग्विजय सिंह यांचंही नाव पुढं आलं आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक आता आणखी रंजक होणार आहे.

गेहलोतांचा गेम झाला आणि दिग्विजय सिंह दिल्लीसाठी पुन्हा ॲक्टिव्ह झाले...
Follow us on

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंजक होऊ लागली आहे. आता दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांचं नाव आता आलं असलं तरी त्याआधीही काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांमध्ये अशोक गेहलोतांनी बाजी मारली होती. तर आता मात्र दिग्विजय सिंह काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची गोष्ट समोर आली आहे. या पदासाठी ते लवकरच उमेदवारी अर्जही दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या दिग्विजय सिंह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत ‘भारत जोडो यात्रे’त (Bharat Jodo Yatra) सहभागी झाले होते. तर आता मात्र भारत जोडो यात्रेतून ते थेट दिल्लीली रवाना होणार आहेत.

याआधी काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत शशी थरूर आणि अशोक गेहलोत यांची नावे समोर येत होती. मात्र राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या गदारोळानंतर अशोक गेहलोत निवडणूक लढवण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

तर दुसरीकडे शशी थरूर यांचे उमेदवारी निश्चित झाल्याचेही सांगण्यात येत आहे. शशी थरुर 30 सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार 30 सप्टेंबर रोजीच नामनिर्देशन करू शकणार आहेत. कारण निवडणूक रिटर्निंग ऑफिसर मधुसूदन मिस्त्री त्यानंतर दिल्लीत नसणार आहेत.

अशोक गेहलोतांचे नाव चर्चेत असले तरी त्यांच्यानंतर शशी थरूर, यांच्याशिवाय मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खर्गे, के.सी. वेणुगोपाल यांचीही नावं अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. त्यानंतर आता या यादीत दिग्विजय सिंह यांचेही नाव चर्चेत आले आहे.

दिग्विजय यांच्याकडे संघटनात्मक आणि प्रशासकीय अनुभव असून ते ते दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. तर गांधी घराण्याच्या निष्ठावंतांमध्ये त्यांची गणना केली जाते.

काँग्रेस सध्या संघ आणि हिंदुत्वाविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामध्ये दिग्विजय सिंह हेदेखील आवाज उठवत आहेत.

दिग्विजय सिंह यांचे नाव नेहमीच चर्चेत असते. ते कोणत्या ना कोणत्या मुद्यावरुन वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि अनेकदा पक्षासाठी अडचणीचे करुन ठेवतात. त्यामुळे त्यांच्याविरोधातही एक गट असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यातच 2019 मध्ये त्यांना भोपाळमधून निवडणुकीत पराजय स्वीकारावा लागला होता. त्याबरोबरच त्यांच्या घराणेशाहीचाही ठपका ठेवला गेला आहे. त्यांनी आपल्या मुलाला आणि भावाला राजकारणात आणून बसवल्याचा आरोप केला गेला आहे.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरुर यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. थरूर हे केरळमधील तिरुवनंतपुरमचे काँग्रेसचे खासदार आहेत.

त्यांच्या नावालाच एक वलय प्राप्त झाले आहे, त्यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली असून थरूर यांची देशात आणि विदेशातही तेवढीच पोहच असल्याचे बोलले जाते.

ते संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने काही प्रकल्पांवरही काम करत आहेत. थरूर यांनी मंत्री म्हणून काम केले आहे, त्यामुळे त्यांना प्रशासकीय अनुभवही आहे.