कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नका, सीबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी थेटच सांगितलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयच्या हीरक महोत्सावत बोलताना अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे चांगलेचं दणाणले आहे.

कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नका, सीबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी थेटच सांगितलं
shailesh musale | Updated on: Apr 04, 2023 | 8:24 AM

नवी दिल्ली : सीबीआयला ६० वर्षे पूर्ण झाली आहे. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमात बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सीबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुम्हाला (सीबीआय) कुठेही थांबण्याची गरज नाही. मला माहीत आहे की तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात ते खूप शक्तिशाली लोकं आहेत, ते वर्षानुवर्षे सरकार आणि व्यवस्थेचा भाग आहेत. आजही अनेक ठिकाणी ते कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेचा भाग आहेत, मात्र तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कोणत्याही भ्रष्टाचाऱ्याला सोडू नये. देशातील जनतेचा सीबीआयवर विश्वास आहे, त्यामुळे आपल्या कार्यकाळात भ्रष्टाचाराला सामोरे जाण्याची आशा लोकांना मिळाली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सीबीआयने आपल्या कामातून सर्वसामान्यांना आशा आणि बळ दिल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. लोकांचा सीबीआयवर इतका विश्वास आहे की ते सीबीआय तपासाच्या मागणीसाठी आंदोलन करतात. सीबीआयने स्वतःला न्यायाचा ब्रँड म्हणून स्थापित केले आहे.

सीबीआयच्या हीरक महोत्सवी सोहळ्यात पंतप्रधान मोदी म्हणाले की, सीबीआयसारख्या व्यावसायिक आणि सक्षम संस्थांशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. बँकेच्या फसवणुकीपासून ते इतर अनेक प्रकरणे मागील सरकारमध्ये घडली आहेत. आम्ही त्यांच्यावर ताशेरे ओढले असून मोठ्या रकमेसह पळून गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

देश भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी सीबीआयची आहे, असेही ते म्हणाले. पीएम मोदी म्हणाले की, पूर्वी योजनांमध्ये लूट व्हायची, ती आम्ही थांबवली आहे. काही लोक बँका लुटून पळून गेले, त्या लोकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सर्वसामान्यांना ना कोणावर अन्याय करायचा आहे आणि ना सहन करायचा आहे. पुढील १५ वर्षांत तुम्ही काय करणार आणि २०४७ पर्यंत तुमची योजना काय असेल, हे सीबीआयने लक्ष्य निश्चित करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी सीबीआयला स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात ते खूप शक्तिशाली लोक आहेत, पण थांबू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काळात कोणाचेही नाव घेतले नाही, परंतु त्यांचा संदर्भ लालू यादव कुटुंबाकडे असल्याचे मानले जाते. ते म्हणाले की, तुम्ही ज्यांच्यावर कारवाई करत आहात तेच सत्तेत होते आणि आजही कोणत्या ना कोणत्या राज्यात सत्तेत बसले आहेत. लँड फॉर जॉब घोटाळ्यात लालू यादव कुटुंबाविरुद्ध सुरू असलेल्या सीबीआय तपासाशी त्यांचं हे वक्तव्य जोडले जात आहे.

Follow Us