माझ्यासाठी कठीण काळ होता..! अखेर गौतम गंभीरने दु:ख सांगितलं
गौतम गंभीर प्रशिक्षकपदी रूजू झाल्यानंतर भारतीय संघाने वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. पण कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची पुरती वाट लागली. आता भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला असून गौतम गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने देदिप्यमान कामगिरी करत जेतेपदाला गवसणी घातली. या संपूर्ण स्पर्धेत एक सामना सोडला तर चांगली कामगिरी झाली. भारताने अंतिम फेरीत न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा जेतेपद मिळवलं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत यश मिळाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी रणनिती आखण्यास गुंतला होता. त्याच्या रणनितीमुळे भारताला पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करता आलं. या विजयानंतर गौतम गंभीरने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील पराभवानंतर खचल्याचं सांगितलं. त्यावेळेस एक व्यक्ती पाठीशी उभी होती असं गौतम गंभीरने सांगितलं. ती व्यक्ती म्हणजे आयसीसी अध्यक्ष जय शाह.. टीम इंडियाच्या विजयानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला की, “न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा पराभव हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट क्षण होता.”
गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीत टीम इंडियाचा घरच्या मैदानावर दोन कसोटी मालिकांमध्ये व्हाईट वॉश मिळाला. यानंतर गौतम गंभीर निराश झाला होता. त्याने सांगितलं की, घरच्या मैदानावर झालेल्या दोन्ही पराभवांना मी कधीही विसरणार नाही. या अपमानास्पद पराभवानंतर कोणीही मला फोन केला नाही. पण जय शाह हा एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी मला फोन करून सांत्वन केलं. जय शाह म्हणाले की, म्हणाला, “हिंमत धर, आम्ही तुझ्यासोबत आहोत.”
गौतम गंभीर म्हणाला की, आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका हरलो, तेव्हा जय शाह यांनी पुन्हा आमचं फोन करून सांत्वन दिले. आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आणि आम्हाला नवीन उत्साह दिला. हे मी नेहमीच लक्षात ठेवेन. जय शाह यांच्या पाठिंब्यामुळेच मी आज टी20 विश्वचषक जिंकलो किंवा प्रशिक्षक म्हणून काम करत राहिलो. इतकेच नाही तर त्यांच्यामुळेच मी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारले, असंही सांगण्यास गौतम गंभीर विसरला नाही. दक्षिण अफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका गमावल्याने भारताचं वर्ल्ड टेस्ट 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं स्वप्न पूर्ण होईल की नाही हे सांगणं कठीण आहे.
