चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 विषयी सर्वात मोठी अपडेट, इस्त्रो प्रमुखांनी केली मोठी घोषणा
Chandrayaan 4 : भारताच्या पुढील चंद्र मोहिमेबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Isro) ने चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

चंद्राचा अभ्यास करण्यासाठी भारताने चांद्रयान मोहिम सुरू केलेली आहे. अशातच आता पुढील चंद्र मोहिमेबाबत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Isro) ने चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. इस्रो चांद्रयान 4 अंतर्गत चंद्रावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर परत आणण्याची योजना आखत आहे. तर चांद्रयान 5 मध्ये जास्त वजनाचा लँडर असणार असून त्याचे मिशन आयुष्यही जास्त असेल अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इस्रोने चांद्रयान -4 बाबत दिली महत्त्वाची माहिती
इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी ते इस्रोच्या भविष्यातील मोहिमांबाबत भाष्य केले आहे. त्यांनी व्हिनस ऑर्बिटर मिशनद्वारे शुक्र ग्रहाचा अभ्यास आणि दुसरी मार्स लँन्डिग मिशनची योजना असल्याची माहिती दिली आहे. इस्रोच्या स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी अवेअरनेस ट्रेनिंग या कार्यक्रमाच्या चौथ्या आवृत्तीच्या उद्घाटनावेळी बोलताना नारायणन यांनी सांगितले की, ‘आम्ही आता चांद्रयान कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यावर काम करत आहोत. चांद्रयान-4 मध्ये आम्ही चंद्रावरून नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची योजना करत आहोत. तर चांद्रयान-5 मध्ये अधिक वजनाचा लँडर आणि अधिक कालावधीचे मिशन असेल.’
350 किलो वजनाचा रोव्हर चंद्रावर पाठवणार
पुढे बोलताना नारायणन यांनी म्हटले की, चांद्रयान-3 मध्ये लँडरचे मिशन आयुष्य फक्त 14 दिवस होते. पुढील मोहिमांमध्ये सुमारे 100 दिवसांचे आयुष्य असलेला लँडर असण्याची शक्यता आहे. रोव्हरही जड असेल. चंद्रयान-3 मध्ये सुमारे 25 किलो वजनाचा रोव्हर होता, तर आगामी मोहिमेत सुमारे 350 किलो वजनाचा रोव्हर पाठवण्याची योजना आहे.
भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा विस्तार झाला
ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही आधीच Mars Orbiter Mission पूर्ण केले आहे आणि आता मंगळावर उतरण्याच्या मिशनवर काम सुरू आहे. काही प्रकल्प सध्या सरकारच्या मंजुरीसाठी विचाराधीन आहेत. तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या अवकाश कार्यक्रमाचा विस्तार झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारताच्या आगामी मोहिमा काय?
पुढे बोलताना नारायणन यांनी सांगितले की, ‘सध्या आम्ही गगनयान कार्यक्रमावर काम करत आहोत आणि पुढील दोन वर्षांत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवून सुरक्षितपणे परत आणण्याची योजना आहे. भारत 2035 पर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन उभारण्याची योजना करत आहे. याशिवाय 2040 पर्यंत भारतीयांना चंद्रावर उतरवून सुरक्षित परत आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी ब्रेनस्टॉर्मिंग उपक्रम आधीच सुरू झाले आहेत.’
