भारतामधील असं एकमेव राज्य तेथील नागरिक इनकम टॅक्सच भरत नाहीत, नाव ऐकून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का
तुम्हाला माहिती आहे का? भारतामध्ये असंही एक राज्य आहे, जेथील नागरिकांना एकही रुपया इनकम टॅक्स भरावा लागत नाही, त्या मागचं कारण देखील असंच हटके आहे. तुम्हाला हे राज्य माहिती आहे का?

भारतामधील नागरिक जो इनकम टॅक्स भरतात त्यातूनच देशाच्या पायाभूत सुविधांचा विकास होतो. नागरिकांना सोई सुविधा मिळतात. देश विकसीत होतो. सरकारच्या नियमानुसार तुमचं उत्पन्न जर एका विशिष्ट मर्यादेच्या पुढे असेल तर तुम्हाला इनकम टॅक्स हा भरावाच लागतो. हा नियम भारतातील प्रत्येक नागरिकासाठी लागू होतो. जर तुमचं उत्पन्न हे इनकम टॅक्सच्या कक्षेत येत असेल आणि तुम्ही जर इनकम टॅक्स भरला नाही तर तुमच्यावर इनकम टॅक्स विभागाकडून कारवाई देखील होते. मात्र तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात असं देखील एक राज्य आहे, ज्या राज्यातील एकही नागरिक इनकम टॅक्स भरत नाही, भलेही त्यांच वार्षिक उत्पन्न हे कोट्यवधी रुपये असलं तरी देखील त्यांना सरकारला इनकम टॅक्स द्यावा लागत नाही? आता तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल की हे नेमकं कोणतं राज्य आहे? आणि येथील लोकांना इनकम टॅक्स का द्यावा लागत नाही?
सिक्कीम हे भारतामधील एकमेव असं राज्य आहे, ज्या राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या लोकांना आपल्या उत्पन्नावर एकही रुपया इनकम टॅक्स द्यावा लागत नाही. मग त्यांचं उत्पन्न कितीही असो, त्यामुळे काही फरक पडत नाही. अनेकांना असाही प्रश्न पडतो की सिक्किममधील लोकांना टॅक्समध्ये विशेष सूट का दिली जाते? संपूर्ण देशात इनकम टॅक्ससाठी एकच कायदा असताना देखील सिक्कीममधील नागरिकांना टॅक्समध्ये विशेष सूट का देण्यात आली? सिक्कीम हे भारताचं राज्य बनण्यापूर्वी 330 वर्ष एक स्वतंत्र्य राज्य होतं. त्या काळात सिक्कीममध्ये त्यांचा इनकम टॅक्ससंदर्भात स्वतंत्र्य कायदा होता.
जेव्हा सिक्कीम 16 मे 1975 साली भारताचं अधिकृत 22 वं राज्य बनलं तेव्हा जो करार झाला त्यामध्ये काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये ही देखील एक अट होती की राज्याची इनकम टॅक्स व्यवस्था ही पूर्वीसारखीच राहील, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. सिक्कीमचा विशेष अधिकार कायम ठेवण्यासाठी भारतीय संविधानात 371F कलम जोडण्यात आलं आहे. त्यामुळे या राज्याला काही विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत, जे देशातील इतर कोणत्याही राज्याला नाहीयेत. सिक्कीममधील जे मुळनिवासी लोक आहेत, त्यांना टॅक्समध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे, येथील लोकांच्या कमाईवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही.