अरे किती निर्लज्जपणा कराल, दुःखावर फुंकर तर सोडा, पंतप्रधान येणार म्हणून रुग्णालयाची रंगरंगोटी कराल का?

मोरबी दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जखमींना भेटणार असल्याने रुग्णालयाची रंगरंगोटी केली जाते आहे. त्यामुळे आता भाजपवर प्रचंड टीका केली जाते आहे.

अरे किती निर्लज्जपणा कराल, दुःखावर फुंकर तर सोडा, पंतप्रधान येणार म्हणून रुग्णालयाची रंगरंगोटी कराल का?
| Updated on: Nov 01, 2022 | 5:02 PM

नवी दिल्लीः गुजरातमध्ये मोरबी येथील पूल दुर्घटना घडल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. मोरबी दुर्घटना घडल्यानंतर विरोधकांकडूनही भाजपवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडली जात नाही. एकीकडे मृतांचा आकडा वाढला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जखमींना भेटणार असून त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आता रुग्णालयातील अनेक छायाचित्रं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहेत. आणि त्यावरुन विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला जात आहे.

 


मोरबी पुलाची दुर्घटना घडल्यानंतर ज्या मोरबी रुग्णालयात जखमींना दाखल केले गेले त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत. त्या व्हिडीओमध्ये रुग्णालयाची रंगरंगोटी करताना पाहायला मिळत आहे. या गोष्टीला काँग्रेसने शोकांतिका म्हटले आहे.

याबाबत काँग्रेसने ट्विटही केले आहे. या अपघातात अनेक लोकांचा जीव गेला आहे, तरीही काही माणसं रंगरंगोटी करण्यात व्यस्त असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या फोटोत याबाबतीत कोणतीही कमतरता राहू नये असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनीही याबाबत ट्विट करत लिहिले आहे की, घरात कोणाचा मृत्यू झाला तर रंगरंगोटी होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयात 134 मृतदेह पडले असून रुग्णालयाला रंगरंगोटी करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तर मनीष सिसोदिया यांनी 27 वर्षांत भाजपने सरकारी रुग्णालयांमध्ये एकही काम केले नसल्याची टीका त्यांनी केली आहे. आणि हे पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी उघड झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही गोष्ट लज्जास्पद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आप नेते नरेश बल्यान यांनीही ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. रुग्णालयामध्ये 177 मृतदेह पडले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून रुग्णालयाला बाहेरून रंग देण्याचे काम सुरू आहे. कारण उद्या फोटोबाजी चालणार असल्याची टीका त्यांच्यावर केली आहे.

गुजरातमधील मोरबीमध्ये रविवारी 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पूल तुटून दुर्घटना घडली होती. या भीषण अपघातात 130 हून अधिक लोकांचा मृत्यूही झाला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडून घटनेची माहिती घेऊन मदत आणि बचाव कार्यही सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.