
खवय्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काही दिवसांपूर्वी काही प्रसारमाध्यमांनी असा दावा केला होता की, आरोग्य मंत्रालय समोसा, जिलेबी आणि लाडू यासारख्या अन्नपदार्थांवर चेतावणी असणारे लेबले लावणार आहे. ज्याप्रमाणे तंबाखूजन्य पदार्थांवर लेबल असतात तसे लेबल लावण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता पीआयबीने फॅक्ट चेक करत यावर भाष्य केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
व्हायरल दावा खोटा
माध्यमांवरील अन्नपदार्थांवर चेतावणी लावण्याचा निर्णय सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. व्हायरल झालेले मीडिया रिपोर्ट्स दिशाभूल करणारे, चुकीचे आणि निराधार आहेत असं पीआयबी फॅक्ट चेकने म्हटलं आहे. त्यामुळे खवय्यांना दिलासा मिळाला आहे.
Some media reports claim that the @MoHFW_INDIA has issued a health warning on food products such as samosas, jalebi, and laddoo.#PIBFactCheck
✅This claim is #fake
✅The advisory of the Union Health Ministry does not carry any warning labels on food products sold by vendors,… pic.twitter.com/brZBGeAgzs
— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 15, 2025
पीआयबीने फॅक्ट चेक केल्यानंतर असे आढळले की, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विक्रेत्यांना अन्नपदार्थांवर चेतावणी लेबले लावण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. मात्र पदार्थांमध्ये असलेल्या फॅटचे किंवा साखरेचे प्रमाण किती आहे याबाबत माहिती देणारे फलक कॅन्टीन किंवा जेवण्याच्या ठिकाणी लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र हे फलक लावणे बंधनकारक नाही.
मीडियामध्ये काय दावा करण्यात आला होता?
काही दिवसांपूर्वी काही माध्यमांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, आरोग्य मंत्रालयाने समोसा, जलेबी, लाडू या गोड पदार्थांबाबत एक उपक्रम सुरू केला आहे. मंत्रालयाने एम्स नागपूरला कॅफेटेरिया आणि समोसा-जलेबीच्या दुकानांजवळ या पदार्थांबाबत फॅट आणि साखरेची माहिती देणारे बोर्ड लावण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे नागरिक सतर्क होतील असं या चेतावणीत म्हटले होते.
वाढता लठ्ठपणा, मधुमेह, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे निर्देश देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले होते. 2050 पर्यंत भारतातील 44.9 कोटी लोक लठ्ठपणाने ग्रस्त असतील, हे टाळण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही माध्यमांनी ही बातमी खोटी असल्याचाही दावा केला होता, त्यानंतर आता पीआयबीने ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.