Bihar Politics : बिहारमध्ये एनडीएतून नितीशकुमार बाहेर पडले तर? भाजपाकडे 2024 साठी काय आहे डॅमेज कंट्रोल प्लॅन?

| Updated on: Aug 08, 2022 | 8:16 PM

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते खुलेपणाने सांगत आहेत की, जर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली तर राजद त्यांचे समर्थन करेल. या सगळ्या गदारोळात राज्यातील सत्तेचं काय होईल, हे तूर्तास जरी गुलदस्त्यात असले, तरी संयुक्त जनता दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास, पुढे लोकसभा निवडणुकीत २०२४ साली काय घडेल याची चर्चा आता सुरु झालेली आहे.

Bihar Politics : बिहारमध्ये एनडीएतून नितीशकुमार बाहेर पडले तर? भाजपाकडे 2024 साठी काय आहे डॅमेज कंट्रोल प्लॅन?
नितीश कुमारांनी एनडीए सोडली तर?
Image Credit source: social media
Follow us on

पटणा – बिहारमधील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. या तापलेल्या वातावरणाची झळ भाजपाला (BJP)बसण्याची शक्यता दिसते आहे. गेल्या तीन दिवसांपासून बिहारच्या राजकीय पटलावर सत्ताधारी संयुक्त जनता दलाचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)आणि  त्यांचा पक्षच बॅटिंग करताना दिसते आहे. इतर पक्षांची इच्छा असूनही ते काहीही करु शकत नाहीयेत. संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या प्रकरणात, उमेश कुशवाहा यांच्याकडून कारणे दाखवा नोटीस पाठवल्यानंतर राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यानंतर आरसीपी सिंह यांनी संयुक्त जनता दलाचा (JDU)दिलेला राजीनामा आणि जेडीयूचे अध्यक्ष ललन सिंह यांच्याकडून भाजपाचे नाव न घेता होत असेलेले हल्ले याने वातावरण अधिकच तापवलेले आहे. राजकीय चर्चा इतक्या टोकाला पोहचल्या की 12ऑगस्टच्या आधीच राज्यात सत्तेत खांदेपालटाची शक्यताही वर्तवण्यात येऊ लागली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते खुलेपणाने सांगत आहेत की, जर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली तर राजद त्यांचे समर्थन करेल. या सगळ्या गदारोळात राज्यातील सत्तेचं काय होईल, हे तूर्तास जरी गुलदस्त्यात असले, तरी संयुक्त जनता दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास, पुढे लोकसभा निवडणुकीत २०२४ साली काय घडेल याची चर्चा आता सुरु झालेली आहे.

सध्या काय आहे पक्षीय बलाबल?

बिहारमध्ये कोलसभेच्या 40 तर विधानसभेच्या 243 जागा आहेत. सध्याच्या बिहारच्या विधानसभेचं संख्याबळ पाहिल्यास, त्यात राजद 80, भाजपा 77 , संयुक्त जनता दल 45, काँग्रेस 19, डावे 16, हम 4. एमआयएम 1आणि अपक्षांची संख्या 1 आहे. तर लोकसभेचा विचार केल्यास भाजपा 17, संयुक्त जनता दल 16आणि एलजेपी (पशुपती) 5, एलजेपी (चिराग पासवान) 1आणि काँग्रेसचा 1 खासदार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राजदचा एकही खासदार नाहीये.

नितीश आणि भाजपाचे नाते तुटले तर काय होईल?

जर नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडली आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वात 2024 ची निवडणूक लढवली तर काय होईल हे पाहण्यासाठी 2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहावे लागतील. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजद, जेडीयू आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. यात 2014 साली भाजपाने 30 जागा लढवल्या होत्या, त्यात 22 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. एनडीेएचा घटकपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीने 7 पैकी 6 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 12 जागा लढवल्या होत्या, त्यात त्यांना 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. 27 जागी निवडणूक लढवणाऱ्या राजदला केवळ 4 जागी विजय मिळवता आला होता. संयुक्त जनता दलाने 38जागा लढवल्या होत्या. त्यात त्यांना केवळ 2 जागा मिळाल्या होत्या.

हे सुद्धा वाचा

2015 साली मात्र बिहार विधानसभा निवडमूक लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार एकत्र लढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएने पूर्ण ताकद लावून ही निवडणूक लढवूनही चांगले यश भाजपाच्या पदरात पडले नव्हते. बिहारी जनतेने कौल नितीश-लालू जोडीला दिला. नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसंभांनंतरही महाआघाडीला 243  पैकी 178 जागा मिळाल्या होत्या. यात राजदला 80 , जेडीयूला 71 आणि काँग्रेसचे 21 आमदार जिंकले होते. दुसरीकडे एनडीएकडे मजबूत जातीय समीकरण असतानाही, भाजपाला 53 , लोक जनशक्ती पार्टी आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पक्षाला 2-2 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर जीतनराम मांझी यांच्या हम पार्टीला 1 जागा मिळाली होती. एनडीएला एकत्रित 58 जागा मिळाल्या होत्या.

भाजपाला फटका बसणार ?

2005 नंतर जेव्हाही बिहारमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, त्यात दोन मोठे पक्ष एकत्र आल्यास त्यांना जनतेचे समर्थन मिळते असे दिसते आहे. त्यावुन असे अनुमान काढता येईल की, 2024 साली जर नितीशकुमार आणि तेजस्वी यादव हे एकत्र आले तर भाजपा आणि एनडीएचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी विशेष म्हणजे उपेंद्र कुशवाहा आणि जीतनराम मांझी हेही नितीशकुमार यांच्यासोबत आहेत.

बिहारच्या 40 जागा मोदींचे गणित बिघडवू शकतात

केंद्राचे राजकारण समजायचे असेल तर उ. प्रदेशच्या 80 आणि बिहारच्या 40 जागा दिल्लीतील केंद्र सरकार ठरवत असतात, असे मानले जाते. या दोन्ही राज्यांतील खासदारांची बेरीज 120 होते. लोकसभेत बहुमतात येण्यासाठी 272 खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. सद्यस्थितीत उ. प्रदेशातून एनडीएचे 66 खासदार आहेत, तर बिहारमधून ही संख्या 39 आहे. या दोन राज्यांतून मोदींकडे 105  एवढे संख्याबळ आहे.

नितीश, तेजस्वी मोदींना झटका देणार?

2015 च्या विधानसभा निवडणुका आधार धरल्या तर 2024 साली नितीशकुमार आणि तेजस्वी यादव मोदी यांचा अशवमेध अडवू शकतात. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत जर महाआघआडीने 40 पैकी 35 जागा जिंकल्या आणि एनडीए 5-6 जागांवर राहिली तर मोदींचे टेन्शन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.