Pahalgam Terror Attack : भारतात दाखल होताच पीएम मोदींनी विमानतळावरच घेतली तातडीची बैठक

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान मोदी सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून काश्मीर फिरायला गेलेल्या 26 पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Pahalgam Terror Attack : भारतात दाखल होताच पीएम मोदींनी विमानतळावरच घेतली तातडीची बैठक
PM Modi took a briefing meeting at the airport
| Updated on: Apr 23, 2025 | 12:13 PM

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. ते आज सकाळी दिल्लीत दाखल झाले. दिल्ली एअरपोर्टवर NSA अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट्र सचिवांनी त्यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंबंधी ब्रीफिंग दिली. आता थोड्याच वेळात पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक होईल. पीएम मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना हा दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारीच पीएम मोदींनी काश्मीरच्या स्थितीचा आढावा घेतला व निर्देश दिले होते.

पीएम मोदी आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चर्चा झाली. मोहम्मद बिन सलमान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

नियोजित बैठक दोन तास उशिराने सुरु झाली

मंगळवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी पीएम मोदी सौदी अरेबियाला गेले होते. त्याचवेळी हा दहशतवादी हल्ला झाला. मोदींनी तिथे सर्वप्रथम पोहोचल्यानंतर काश्मीरच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यामुळे क्राऊन प्रिन्ससोबतची नियोजित बैठक दोन तास उशिराने सुरु झाली. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात बहुतांश पर्यटक होते. 2019 पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

डिनरच्या कार्यक्रमात सहभागी नाही

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांनी सौदी क्राऊन प्रिन्ससोबत द्विपक्षीय चर्चा केली. पण अधिकृत डिनरच्या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. दौऱ्याचा कालावधी कमी करुन मंगळवारी रात्रीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. पहलगाम येथे झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तात्काळ काल श्रीनगरला रवाना झाले. त्यांनी श्रीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. पहलगाममध्ये ज्यांनी हल्ला घडवून आणला, त्यांच्यापैकी एकालाही सोडणार नाही हे भारत सरकारने स्पष्ट केलं आहे.