बीबीसी कार्यालयावर धाड; भाजप म्हणते पत्रकारितेच्या नावाखाली अजेंडा; तर काँग्रेस म्हणते…

काँग्रेस, टीएमसी आणि बीआरएस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या एजन्सी आता पिंजऱ्यात पोपट बनण्याऐवजी ते त्यांचे काम योग्य पद्धतीने काम करत आहेत.

बीबीसी कार्यालयावर धाड; भाजप म्हणते पत्रकारितेच्या नावाखाली अजेंडा; तर काँग्रेस म्हणते...
| Updated on: Feb 14, 2023 | 5:00 PM

मुंबईः सध्या देशात ईडी, सीबीआय यासारख्या संस्थांकडून पडणाऱ्या धाडीमुळे राज्याबरोबरच देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. बीबीसीच्या दिल्ली-मुंबई कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकल्यानंतर राजकारणालाही आता आणखी वेग आला आहे. दोन्ही कार्यालये सील करण्यात आली असून तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. बीबीसीने गुजरात दंगलीवर एक डॉक्युमेंटरी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काही आठवड्यातच हा छापा पडला आहे.

बीबीसीच्या कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यावर भाजपने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना बीबीसीवर टीका करताना त्यांनी बीबीसी म्हणजे पत्रकारितेच्या नावाखाली एक प्रकारचा अजेंडा चालवत असल्याचे म्हटले आहे.

बीबीसीवर छापा टाकल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले की, प्राप्तिकर विभाग नियमानुसार काम करत आहे.

परंतु काँग्रेस, टीएमसी आणि बीआरएस ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या एजन्सी आता पिंजऱ्यात पोपट बनण्याऐवजी ते त्यांचे काम योग्य पद्धतीने काम करत आहेत.

तर दुसरीकडे त्याचवेळी बीबीसीच्या कार्यालयावरील छापेमारीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, ही एकप्रकारची अघोषित आणीबाणीच आहे.

ते म्हणाले की आम्ही अदानी प्रकरणावर जेपीसीची मागणी करत आहोत आणि सरकार बीबीसीच्या मागे आहे. त्यांनी या छाप्याला ‘विनाशकाली विपरीत बुद्धी असे म्हटले आहे.

भाटिया यांनी बोलताना सांगितले की, एखाद्यावर छापा टाकला जात असेल आणि तो भारताच्या कायद्याचे पालन करत असेल तर काळजी करण्याची काहीच गरज नाही.

त्यामुळे आयकर विभागाला त्यांचे काम करू द्यावे, या प्रकारामुळे आता दूध का दूध आणि पानी का पानी होईल असंही ते ते म्हणाले की, बीबीसी हे भारताविरुद्ध अपप्रचार करण्याचे साधन बनले आहे तर बीबीसी ही भारतासाठी द्वेषाने काम करण्याचेही एक षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली आहे.

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना भाजपने म्हटले की, खुद्द इंदिरा गांधी यांनी बीबीसीवर बंदी घातली होती. स्वतंत्र पत्रकारिता करण्यासाठी बीबीसीचे स्वागत आहे, पण ते पत्रकारितेच्या नावाखाली अजेंडा चालवत असेल तर ते चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे.

काश्मीरमधील एका दहशतवाद्याचे वर्णन चुकीच्या अर्थाने करण्यात आली होती, अशी टीका करण्यात आली. तर देशातील होळी सणाला गलिच्छ सण म्हटले आहे. महात्मा गांधींचाही अनादर केला गेला असल्याचे म्हटले आहे.