Draupadi Murmu: ‘आता भारत थांबणार नाही’, 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देशाला मोठा संदेश
President Draupadi Murmu Message to Nation: 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला महत्त्वाचा संदेश दिला. त्यांच्या भाषणात विकास, लोकशाही मूल्य आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रामुख्याने भर दिसला. त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज 14 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला महत्त्वाचा संदेश दिला. त्यांच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनातून विकास, लोकशाही मूल्य आणि भविष्यातील उद्दिष्टांवर प्रामुख्याने भर दिसला. त्यांनी आता भारत थांबणार नाही असा विश्वास व्यक्त केला. स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय याची फोड केली. तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा प्रतिक आहे, असे म्हणत यावेळी त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
राष्ट्रपतींनी भाषणाच्या सुरुवातीला, सर्व भारतीयांना 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपला तिरंगा हा स्वातंत्र्याचे प्रतिक आहे. आपण तो अत्यंत अभिमानाने फडकवतो. स्वातंत्र्याचा खरा अर्थ हा प्रत्येक नागरिकाला आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संधी मिळाव्यात आणि त्या संधींचा लाभ घेता यावा. भारताला जगातील सर्वात पुढारलेला देश तयार करण्याच्या उद्दिष्टासाठी आपण काम करून असे राष्ट्रपती म्हणाल्या.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारतमाता परकीय गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाली. देशवासीय स्वतंत्र भारताच्या भविष्याचे शिल्पकार झाले. निष्ठेने शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक, अभियंते, डॉक्टर, आरोग्य दूत, कर्मचारी, कष्टकरी, अन्नदाता शेतकरी तसेच विविध क्षेत्रात प्रयत्नांची पराकाष्ठा करून राष्ट्रनिर्मितीत सिंहाचा वाटा उचलणारे असंख्य देशवासी आणि संविधानाचे पालन करणारे सर्व नागरीक हे राष्ट्र निर्मितीमधील महत्त्वाचे भागीदार असल्याचे द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
वयं राष्ट्रे जागृयाम
आता अवघ्या काही तासात आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा 80 वे वर्ष सुरू होईल. देश-विदेशात राहणारे सर्व भारतीय हा उत्सव आनंदाने साजरा करतात असे त्या म्हणाल्या. आपल्या समृद्ध वारसा, स्वातंत्र्य लढा या आदर्शांचा स्वीकार करत आपण आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जात आहोत. ‘वयं राष्ट्रे जागृयाम’ हे वेदवाक्य आपल्याला राष्ट्राला सदैव जागरूक राहण्याची प्रेरणा देते असे मुर्मू म्हणाल्या.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात असंख्य देशवासी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसुधारणा आणि राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श मांडले. भारत मातेच्या या सर्व महान सुपुत्रांना आणि सुपुत्रींना मी आदरपूर्वक नमन करते. ज्यांच्या आदर्शांवर चालत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे वाटचाल करत राहिला. यावेळी त्यांनी फाळणीच्या आठवणी, वेदनाही जागवल्या. 550 हून अधिक संस्थानांना नवस्वतंत्र भारतात सामील करून घेण्याचे मोठे आवाहन होते असे त्यांनी सांगितले.
गेल्या दशकापेक्षा अधिक काळात भारताने वेगाने आणि सर्वसमावेशक विकास साधला आहे. वारसा आणि विकास यांचा समन्वय साधण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. विकासात अडथळे ठरलेले अनेक दशकांपूर्वीचे अडसर दूर करण्यात आले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. त्यांनी यावेळी डिजिटल इंडियाचा उल्लेख केला. दिल्ली ते गल्लीपर्यंत डिजिटल पेमेंटचा वापर होत आहे. देशाने उत्तम डिजिटल पायाभूत सुविधांपैकी एक व्यवस्था विकसीत केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.