मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश

| Updated on: Jan 26, 2021 | 4:11 PM

सिंघु, टिकरी आणि मुकरबा या या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. | Delhi Farmer Tractor Rally

मोठी बातमी: शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर दिल्लीतील इंटरनेट सेवा बंद; गृहमंत्रालयाचे आदेश
गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा या या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
Follow us on

नवी दिल्ली: दिल्लीतील शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीने (Delhi Farmer Tractor Rally) हिंसक वळण घेतल्यानंतर आता मोदी सरकारकडून काही महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता दिल्लीच्या काही भागांमधील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा बंद करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काही वेळापूर्वीच स्थानिक प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. (Internet services snapped in some parts of Delhi-NCR in view of the prevailing law and order situation)

गृहमंत्रालयाच्या या आदेशानुसार सिंघु, टिकरी आणि मुकरबा, नांगलोई, नकुरबा चौक या तणावग्रस्त भागातील इंटरनेट आणि टेलिग्राम सेवा रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीत या निर्णयाचे काय पडसाद उमटणार हे पाहावे लागेल.

आतापर्यंत काश्मीरमध्ये आपातकालीन प्रसंगात असंतोष पसरु नये म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा पर्याय सर्रास अवलंबिला जातो. यापूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) ईशान्य दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावेळीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर आता दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान असलेल्या 7 लोककल्याण मार्गावरील सुरक्षाव्यवस्थेतही कमालीची वाढ करण्यात आल्याचे समजते.

दिल्लीतील मेट्रो सेवा बंद

नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा एक गट लाल किल्ल्यावर धडकला

दिल्ली सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढण्यात आले होते. मात्र, यापैकी काही शेतकरी नियोजित मार्ग सोडून लाल किल्ल्यावर जाऊन पोहोचले. काही आक्रमक आंदोलकांनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंड्याच्या शेजारी असलेल्या एका खांबावर चढून शेतकरी संघटनेचा झेंडाही लावला. यानंतर आक्रमक आंदोलनकांपैकी अनेकांनी लाल किल्ल्यावर ठिकठिकाणी चढून शेतकरी संघटनेंचे झेंडे फडकावले. विशेष म्हणजे यावेळी अनेक शेतकरी आंदोलक हातात तिरंगा झेंडा फडकावत सरकारचा निषेध करतानाही दिसले.

संबंधित बातम्या:

Delhi Farmer Protest : दगडफेक, लाठीचार्ज ते घमासान, शेतकरी आंदोलनातील 10 मोठ्या घडामोडी

Delhi Farmers Tractor Rally VIDEO : भयानक विद्रोह! आंदोलकांकडून पोलिसांवर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न

मग शेतकऱ्यांना गोळ्या घालायच्या का?; शेतकरी नेते टिकैत यांचा संतप्त सवाल

(Internet services snapped in some parts of Delhi-NCR in view of the prevailing law and order situation)