Kangana Ranaut : ‘गटर पिढी’नंतर पुन्हा कंगना बरसल्या; आता CJP च्या सौरभ दासवर सडकून टीका
अभिनेत्री आणि खासदार कंगान रानौत यांनी पुन्हा कॉक्रोच जनता पार्टी ( CJP) ला लक्ष्य करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी कंगनाने सीजेपी प्रवक्ता सौरभ दासला टार्गेट केलं असून त्याच्यावर हल्ला चढवला आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत अभिनेत्री आणि खासदार कंगना रानौत यांच्या चीड आणणाऱ्या वक्तव्यांची मालिका सुरूच आहे. CJP च्या आंदोलनच सहभागी झालेल्या तरूणांना कंगना यांनी गटार जनरेशन असं म्हटलं होतं. ज्या Gen -Z ने रकारला जुकवलं, कंगना यांना ती जनरेशन गटार वाटते. त्यावरून त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत असून अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र कंगना एवढ्यावरच थांबलेल्या नसून आता त्यांनी पुन्हा सीजेपीवर हल्ला चढवला असून यावेळी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास हे त्यांच्या टार्गेटवर आहेत. सौरभ दास हा बेकार, बेरोजगार असल्याचे म्हणत, त्याच्या वयात आपण तर दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते, असं कंगना यांनी आपल्या इन्स्टाग्रा् अकाऊंटच्या स्टोरीमध्ये नमूद केलं आहे. आधी CJP च्या आंदोलनकर्त्यांविरोधी वक्तव्य, आणि आता त्यांनी सौरव दासवर निशाणा साधला आहे. त्यानंतर दोघांमधील शाब्दिक संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.
काय म्हणाल्या कंगना रानौत ?
“मी या व्यक्तीबद्दल गुगलवर शोध घेतला. तो 28 वर्षांचा आहे. मग तो स्वतःला विद्यार्थी कसा म्हणवतो, हे मला समजत नाही” असं कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर सौरव दास यांचा एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं. त्यासोबत कंगना यांनी एक नोटही लिहीली. “मी गेली दोन वर्षं राजकारणात आहे, पण सार्वजनिक जीवनात मला 20 वर्षे झाली आहेत. मी सौरवच्या वयाची होते, तेव्हा त्या वयात मी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते.” कंगना यांनी पुढे लिहीलं की, नवीन खासदार म्हणून सुरुवातीला अनेक जबाबदाऱ्यांमुळे त्या भारावून गेल्या होत्या. “मी चित्रपट निर्माती, अभिनेत्री, निर्माती, पटकथालेखिका आणि उद्योजिका आहे. त्यामुळे विविध जबाबदाऱ्यांचा समतोल साधावा लागतो,” असं त्यांनी नमूद केलं.
यानंतर त्यांनी सौरव दासवर जोरदार टीका केली. “ज्याने स्वतः काहीही केलेले नाही, त्याला या गोष्टी समजणार नाहीत. प्रिय सौरव, तुमच्या समस्या वैयक्तिक आहेत. स्वतःला विद्यार्थी म्हणण्यापेक्षा काहीतरी शिकण्यास सुरुवात करा.” अशा शब्दांत त्यांनी सौरव यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना सल्लाही दिला.
काय म्हणाला होता सौरव दास ?
याआधी सौरव दास यांनी कंगनांवर टीका केली होती. “त्यांच्या स्वतःच्या पक्षातील अनेक लोकही कंगना यांना फारसं गंभीरपणे घेत नाहीत. मग आम्ही का घ्यावे?” असा सवाल उपस्थित केला होता. ” जनरेशन झी, जनरेशन अल्फा किंवा आजची तरुण पिढी त्यांच्या वक्तव्यांना गांभीर्याने घेते, असं मला वटत नाही” असंही तो पुढे म्हणाला होता.
एवढंच नव्हे तर त्यांने कंगना यांच्या एका जुन्या विधानाचाही उल्लेख केला. हिमाचल प्रदेशातील आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यानंतर कंगना यांनी खासदारपदाचे काम अपेक्षेपेक्षा अधिक मेहनतीचे असल्याचे सांगितले होते. यावरून त्यांच्या राजकीय तयारीबाबत प्रश्न निर्माण होतात, असे सौरव यांनी म्हटलं होतं. तसेच, “जनरेशन झी देशासाठी त्यांच्यापेक्षा अधिक योगदान दिलं आहे,” असा दावा करत सौरव यांनी कंगना रानौतवर टीका केली होती.
‘गटर पिढी’ टिप्पणीवरून वाद
कंगना यांनी त्यांनी जनरेशन झेडच्या आंदोलनकर्त्यांवर टीका केली होती. कंगना यांनी आंदोलनाशी संबंधित व्हिडिओ पाहून “उबग येतो” असे म्हणत त्यांना “गटर पिढी” असे संबोधले होतं, त्यानंतर सौरव दास यांची प्रतिक्रिया आली होती.
इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचे व्हिडिओ “घाण, कचरा आणि असभ्यतेचे प्रदर्शन” असल्याचे म्हटलं होतं. “मी आयुष्यात एकाच ठिकाणी इतका असभ्यपणा कधीच पाहिला नव्हता. ते ज्या प्रकारे बोलतात आणि ज्या भाषेचा वापर करतात, ते पाहून उबग येतो. अशा वर्तनाला कोण प्रोत्साहन देत आहे?” असा सवालही कंगना यांनी उपस्थित केला होता.