
हिमाचल प्रदेशातील किन्नरमध्ये भू-स्खलन झाल्यानं हाहाकार माजला. यात अनेक गाड्या, कार आणि अगदी मोठी वाहनं देखील ढिगाऱ्याखाली दबली गेली. या ढिगाऱ्यात अनेक माणसं देखील गाडले गेले असावेत अशीही भीती व्यक्त केली जातेय. या भूस्खलनात हिमाचल प्रदेश ट्रांसपोर्ट कॉर्पोरेशनची बस देखील दबली गेलीय. त्यामुळे युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे.

रिकांग पियोपासून शिमला मुख्य मार्गवर आयटीबीपी आणि NDRF च्या जवानांकडून मदत कार्य सुरू आहे. आतापर्यंत 5 लोकांना वाचवण्यात यश आलंय. ITBP ची 43 वी, 17 वी आणि 19 वी बटालियनचे जवान मदतकार्य करत आहेत.

आयटीबीपीच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढलं. मात्र, बसमधील प्रवासी शेवटची माहिती मिळाली तोपर्यंत अडकलेले होते. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

असं असलं तरी या मार्गावरील दोन्ही बाजूने दगडं पडलेले आहेत. त्यामुळे आयटीबीपीच्या जवानांना मदत कार्य करण्यात अनेक अडथळे येत आहेत.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी पोलीस प्रशासनाला मदत कार्य करण्याचे आदेश दिलेत. NDRF ला देखील अलर्टवर राहण्यास सांगितले आहे. एक बस आणि कार ढिगाऱ्याखाली दबलेले आहेत. डॉक्टरांचं एक पथकही घटनास्थळावर दाखल झालं.