सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला, निर्णय कधीही; 7 जणांच्या घटनापीठाकडे प्रकरण देण्याचा सस्पेन्स कायम!

यापूर्वी राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. आधी हे प्रकरण व्हॅकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण आलं.

सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला, निर्णय कधीही; 7 जणांच्या घटनापीठाकडे प्रकरण देण्याचा सस्पेन्स कायम!
supreme court
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 2:10 PM

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी कायदेशीर तथ्य आणि सत्तांतराच्या घटनाक्रमावर जोरदार युक्तिवाद केला. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे. कोर्टाने आता याबाबतचा निर्णय राखून ठेवला असून या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय कधीही निर्णय देणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण देण्याचा सस्पेन्सही कायम आहे. त्यामुळे कोर्ट थेट निकाल देणार की हे प्रकरण सात जणांच्या खंडपीठाकडे पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठासमोर गेल्या आठ महिन्यांपासून युक्तिवाद सुरू होता. शिंदे गटाचे वकील हरीश साळवे, नीरज कौल आणि मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.

आजच्या सुनावणी दरम्यान, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटकाचा दाखला दिला गेला. तसेच नबाम रेबिया प्रकरण आणि किहेतू प्रकरणाचे दाखलेही देण्यात आले. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी शिंदे गटाच्या वकिलांना काही सवालही केले.

लार्ज बेंचची मागणी

गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात नियमित सुनावणी झाली होती. यावेळी ठाकरे गटाने हे प्रकरण 7 जणांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी केली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण लार्जर बेंचकडे पाठवावे का? असा प्रश्न काल शिंदे गटाच्या वकिलांना करण्यात आला होता. पण शिंदे गटाच्या वकिलाने त्यावर काहीच भाष्य केलं नव्हतं.

सलग तीन दिवस सुनावणी

मात्र, सलग तीन दिवस सुनावणी करण्यात आल्यानंतर आता ही सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल कोर्टाने आज दिला नाही. कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. कोर्ट हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे देण्याचा निर्णय घेणार की या प्रकरणावर थेट निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

असा आहे क्रम

यापूर्वी राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुनावणी सुरू आहे. आधी हे प्रकरण व्हॅकेशन बेंचकडे देण्यात आलं होतं. त्यानंतर तीन न्यायाधीशांकडे हे प्रकरण आलं. त्यानंतर आता पाच न्यायामूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण आलं. आता हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.