Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काय-काय घडलं? पहा संपूर्ण टाइमलाइन

Malegaon Bomb Blast : 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आज एनआयएच्या विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. साध्वी प्रज्ञा ठाकूर आणि इतर सात आरोपींवर दहशतवाद, हत्या आणि धार्मिक उन्माद पसरवण्याचा आरोप होता. 17 वर्षांनंतर या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात काय-काय घडलं? पहा संपूर्ण टाइमलाइन
malegaon bomb blast
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 31, 2025 | 12:00 PM

मालेगाव बॉम्बस्फोटा प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्षोद मुक्तता झाली आहे. NIA विशेष न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भोपाळच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर होत्या. त्यांच्या व्यतिरिक्त लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपी आहेत, ज्यांच्यावर दहशतवादी कट रचणे, हत्या करणे आणि धार्मिक उन्माद पसरवणे असे आरोप होते.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं सुमारे 17 वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता. याशिवाय 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला होता. त्यामुळे जखमींची संख्या जास्त होती. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी 30 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावच्या आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी कलम 307, 302, 326, 324, 427, 153- अ, 120 ब, स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

साध्वी प्रज्ञा यांच्या नावाने बाईक

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला होता, नंतर संपूर्ण तपास एटीएसकडे सोपवण्यात आला होता. एलएमएल फ्रीडम (MH15P4572) क्रमांकाच्या बाईकमध्ये स्फोट झाल्याचं उघड झालं होतं. या बाईकमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. परंतु गाडीवर सापडलेला नंबर चुकीचा होता आणि त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबरदेखील मिटवण्यात आला होता.

या प्रकरणाची चौकशी करताना एफएसएल टीमला गाडीचा अचून नंबर सापडला. ज्यामुळे ती गाडी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या नावावर असल्याचं उघड झालं. घटनेच्या सुमारे एक महिन्यानंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली. संपूर्म प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली होती. तर साध्वी प्रज्ञा यांना या प्रकरणात मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं.

300 हून अधिक साक्षीदारांचे जबाब

मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास पोलीस, एटीएस आणि एनआयए यांनी केला आहे. संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान 300 हून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदण्यात आले. या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीला जवळजवळ 17 वर्षांचा कालावधी लागला. आतापर्यंत या प्रकरणात 35 साक्षीदारांनी बंडखोरी केली. साक्षीदारांनी न्यायालयात अनेकदा सांगितलं की, त्यांना बंदुकीच्या धाकावर धमकावून त्यांचे जबाब घेण्यात आले. साक्षीदार वारंवार बंडखोरी करत असल्याबद्दल न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली होती. आता 17 वर्षांनंतर NIA विशेष न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची टाइमलाइन

  • 29 सप्टेंबर 2008 : मालेगावमध्ये बॉम्बस्फोट, 6 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जण जखमी
  • ऑक्टोबर 2008 : महाराष्ट्र एटीएसकडून तपास सुरू, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांसह इतरांना अटक
  • 2009 : तपास एनआयएकडे सोपवण्यात आला
  • 2011 : एनआयएनं पहिलं आरोपपत्र दाखल केलं
  • 2016 : एनआयएनं साध्वी प्रज्ञा आणि इतर 6 जणांविरुद्ध नवीन आरोपपत्र दाखल केले, पुराव्या अभावी मकोका रद्द केला
  • 2017 : सर्वोच्च न्यायालयाने कर्नल पुरोहित यांना जामीन मंजूर केला
  • 2017 : न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांनाही जामीन मंजूर केला
  • 2018 : मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने या प्रकरणात आरोप निश्चित केले
  • 2019 : साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभा निवडणूक जिंकली, भोपाळमधून खासदार झाल्या
  • 2023-2024 : अनेक साक्षीदारांनी जबाब फिरवले, एटीएसवर दबावाचा आरोप
  • 31 जुलै 2025 : NIA विशेष न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता