मोठी बातमी! ममता बॅनर्जींवर दुःखाचा डोंगर, भाचीने संपवलं जीवन, राहत्या घरात…
Mamata Banerjee Niece : ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ममता यांची भाची वृष्टी मुखर्जी यांनी जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे.

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ममता यांची भाची वृष्टी मुखर्जी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी रामपूरहाट येथील त्यांच्या घरात वृष्टी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केली आहे. वृष्टी मागील चार ते पाच वर्षांपासून नैराश्याने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहितीही समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ममता बॅनर्जी यांच्या मामेभावाची मुलगी
पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासात वृष्टी यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांची सरकारी ग्रुप-सीची नोकरी गेली होती. याशिवाय अलीकडेच सुरू असलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणामुळेही त्या मानसिक तणावात असल्याचे सांगितले जात आहे. वृष्टी मुखर्जी या ममता बॅनर्जी यांचे मामेभाऊ निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. निहार मुखर्जी हे रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कुटुंबाचे माहेर रामपूरहाटमधील कुसुंबा गावात आहे. वृष्टी स्थानिक शाळेत ग्रुप-सी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या.
शिक्षक भरती घोटाळ्याच्या तपासादरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांना जवळपास 90 टक्के OMR शीटमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. या तपासात वृष्टी यांच्यासह अनेक उमेदवारांची नावे समोर आली होती. या उमेदवारांना कथितरित्या गैरप्रकाराचा फायदा झाल्याचा आरोप होता. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात आली आणि वृष्टी यांची सरकारी नोकरी गेली होती.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
मंगळवारी दुपारी कुसुंबा गावातील त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीत कपड्याच्या साहाय्याने वृष्टी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच रामपूरहाट पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून तपासणीसाठी रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवला. वृष्टी यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रामपूरहाट पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वृष्टी मागील चार-पाच वर्षांपासून नैराश्याशी झुंज देत होत्या आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते. पोलिसांच्या तपासानंतर त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.