कर्नाटक सरकारनं अशा गुंडावर ताबडतोब कारवाई करावी, नाही तर…; भाजपच्या मंत्र्यांनी बोमईंना घेरले

महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी.

कर्नाटक सरकारनं अशा गुंडावर ताबडतोब कारवाई करावी, नाही तर...; भाजपच्या मंत्र्यांनी बोमईंना घेरले
महादेव कांबळे | Updated on: Dec 06, 2022 | 4:56 PM

मुंबईः मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद वाढल्यापासून सीमाभागातील वातावरण तंग होते. त्यानंतर आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. त्यामुळे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंगटीवार यांनी थेट कर्नाटक सरकारला इशारा देत मराठी भाषिकांना देण्यात येणारे त्रास कमी करा आणि कर्नाटकातील अशा गुंडांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील जनता आणि महाराष्ट्र सरकार एक भारत श्रेष्ठ भारत सोबत आहे.

मात्र जर कोणी गुंडाने महाराष्ट्राशी गुंडगिरी करण्याचा प्रयत्न केला तर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हे कर्नाटकने लक्षात ठेवावे आणि आणि अशा लोकांना आम्ही नक्कीच धडा शिकवू शकतो असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी. आणि जे जाळपोळ करतात, त्यांना तुरुंगात टाकावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

तसेच कर्नाटक सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे, त्यांनी हलकेच घेतले तर त्याचे चांगले परिणाम होणार नाहीत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे..

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सीमावादावर बोलताना त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचे प्रश्न तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जन्माला घातले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

प्रांत निर्मितीसाठी आयोग स्थापन झाला तेव्हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या आवाजाचा आदर केला नाही आणि त्याचे परिणाम आज महाराष्ट्रातील जनता, मराठी जनता भोगत आहे असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.

आपल्या पक्षाची बाजू मांडताना ते म्हणाले की, आमचे वकील या प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयात गांभीर्याने लढा देत आहेत, सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या प्रश्नावर राज्य आणि राजकारण करू नका, कारण याविषयावर एकत्र बसून विचार करायला हवा. समाजकंटक अशा पद्धतीने घातपात करत असतील तर महाराष्ट्र सरकारच्यावतीने त्यांना इशारा देण्यात येत आहे की कर्नाटक सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि अशा समाजकंटकांना शिक्षा करावी असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रमध्ये इतर राज्यातील लोकांचा सन्मान केला जातो. हे सगळे असताना महाराष्ट्रातील लोकांच्या मागे असे लागत असतील तर त्यांनाही वाटेवर लावण्याची हिम्मत महाराष्ट्रात आहे असा इशारा सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us