भारतात AI चे वारू उधळणार, शिक्षण मंत्रालयाचे विशेष सत्र, दिग्गजांनी मांडला रोडमॅप

AI in India: जगभरात एआयचा डंका वाजला आहे. तर आता भारतातही एआयचं वारू उधळलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यासाठी एक खास सत्र बोलावलं होते. त्यात या क्षेत्रातील दिग्गजांनी मोठी बाजू मांडली. त्यांनी भारतातील एआयच्या भविष्यासंदर्भात रोडमॅप मांडला.

भारतात AI चे वारू उधळणार, शिक्षण मंत्रालयाचे विशेष सत्र, दिग्गजांनी मांडला रोडमॅप
AI ची घोडदौड
Image Credit source: पीआयबी
| Updated on: Feb 17, 2026 | 1:10 PM

AI in India: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित केले. जगात एआयमुळे अनेक क्षेत्रांनी झपाट्यानं कात टाकली आहे. भारतातही एआयचे वारू उधळले आहे. भारतात एआयला पुढे नेण्यासंदर्भात शिक्षण मंत्रालयाने विशेष सत्र बोलावले होते. आज 17 फेब्रुवारी रोजी हे सत्र आयोजित करण्यात आले. या चर्चा सत्रात देशातील दिग्गजांनी हजेरी लावली. दिल्लीतील भारत मंडपम येथे भारतातील कृत्रिम बुद्धमत्तेच्या क्षेत्रातील प्रगती या विषयावर व्यापक चर्चा सत्र झाले.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

या सत्रात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण व कौशल्य विकास, उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांची उपस्थिती होती. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिवर्तनशील क्षमतेचा लाभ घेण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत आहे. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात एआय मॉड्यूलचा एकत्रीकरण्यासाठी मंत्रालय प्रयत्न करत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) शी सुसंगत आणि विकसीत भारत 2047 राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत एआय परिसंस्था, इकोसिस्टिम तयार करण्यावर मंत्रालयाचा भर आहे.

गेल्या एका दशकात, शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म, धोरणात्मक चौकटी, संस्थागत सुधारणा, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, कौशल्य विकास, प्रगत संशोधन व नवोपक्रम परिसंस्थांच्या समावेशासाठी एआय सक्षम शिक्षणाची पायाभरणी केली आहे. आता त्यात पुढील टप्पा गाठण्यासाठी या परिसंवादाच्या माध्यमातून एक मोठी झेप घेण्यात आली आहे.


अर्थसंकल्पात केंद्र सरकारची विशेष तरतूद

गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने शिक्षणासाठी एआय उत्कृष्टता केंद्र स्थापन केले. IIT मद्रास येथे एआयचे संचालन करण्यात येत आहे. एआयच्या एकत्रीकरणासाठी आराखडा तयार करण्याचा मानस आहे. त्यासाठी शिक्षण क्षेत्र, उद्योग, नागरी समाज आणि शासकीय संस्थांबरोबर व्यापक सल्लामसलत करण्यात येत आहे. एआय स्टार्टअप्सचे संस्थापकांशी शिक्षण मंत्र्यांनी चर्चा केली. त्यांनी दोन दिवसीय भारत एआय कॉन्क्लेव्ह 2026 चे अध्यक्षस्थान भुषवले. शिक्षण क्षेत्रात एआय आधारीत क्रांती आणण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात येत आहे.सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा, उत्कृष्टता केंद्र, शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम एकत्रिकरण आणि उद्योग स्टार्टअप्स या विषयावर शिखर परिषदेत मंथन करण्यात आले. या सत्रात भारताच्या धोरणात्मक दृष्टिकोनापासून ते मोठ्या प्रमाणावरील अंमलबजावणी पर्यंतच्या प्रवासाची चर्चा झाली. या चर्चा सत्रात

डॉ. श्रीधर वेम्बु, संस्थापक आणि सीईओ, Zoho Corporation

डॉ. विभू मित्तल, तंत्रज्ञानतज्ज्ञ आणि नवोपक्रम नेते, Inflection

श्री राजन आनंदन, व्यवस्थापकीय संचालक, Peak XV Partners

प्राध्यापक मणींद्र अग्रवाल, संचालक, IIT कानपुर

प्राध्यापक वी. कामकोटि, संचालक, IIT मद्रास

प्राध्यापक सुनीता सरावगी, IIT बॉम्बे

यांनी सहभाग घेतला. तर चर्चा सत्राचे संचालन आयआयटी जम्मूचे संचालक मनोज एस. गौर यांनी केले. या चर्चेत शासन संरचना, राष्ट्रीय शिक्षण मंच, स्वदेशी एआय नवोपक्रम आणि अत्याधुनिक एआय मॉडेल्सचा जबाबदारीपूर्वक वापर भारतातील शिक्षण परिणामांना नवे स्वरूप देण्यासाठी कशाप्रकारे एकत्र येत आहेत यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.