पंचनाम्याची वाट न पाहता व्यापाऱ्यांना विम्याची 50 टक्के रक्कम तातडीने द्या; राष्ट्रवादी, शिवसेनेचे खासदार सीतारामन यांना भेटले

| Updated on: Aug 02, 2021 | 4:58 PM

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे आदी खासदारांनी निर्मला सीतारामन यांची आज भेट घेतली. (maharashtra flood)

पंचनाम्याची वाट न पाहता व्यापाऱ्यांना विम्याची 50 टक्के रक्कम तातडीने द्या; राष्ट्रवादी, शिवसेनेचे खासदार सीतारामन यांना भेटले
shivsena-ncp mp
Follow us on

नवी दिल्ली: महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे व्यापारी वर्गाचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम मिळावी म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांना तातडीने विम्याची 50 टक्के रक्कम देण्यात यावी, अशी मागणी या खासदारांनी सीतारामन यांना केली आहे. (ncp-shiv sena mp urges nirmala sitharaman to release 50% of insured amount to flood-hit)

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे आदी खासदारांनी निर्मला सीतारामन यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांना राज्यातील पूरस्थितीची माहिती देतानाच व्यापाऱ्यांना तातडीने 50 टक्के विम्याची रक्कम मिळण्यासाठी विमा कंपन्यांना आदेश देण्याची मागणी केली. तसं निवेदनही त्यांनी अर्थमंत्री सीतारामन यांना दिलं आहे.

विमा हा मोठा आधार

काही दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या महापुरामुळे रायगड जिल्ह्याचं आतोनात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, घरात-दुकानात पाणी शिरले. त्यामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. यात व्यापाऱ्यांचंही अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, विमा कंपन्या पाण्यात भिजलेलं सर्व अन्नधान्य आणि इतर साहित्य पाहूनच नुकसान भरपाई देत असतात. विमा कंपन्यांचे अधिकारी येण्यासाठी वेळ लागतो. तोपर्यंत हे भिजलेलं साहित्य ठेवणं शक्य नाही. त्यामुळे हे साहित्य सडून ते कुजून त्यामुळे आजाराचा फैलाव होऊ शकतो. कोकणातील लोक निसर्ग आणि तौक्ते वादळाने पोळून निघाले आहेत. त्यात आता त्यांना महापुराचा फटका बसला असून त्यात त्यांचं शंभर टक्के नुकसान झालं आहे. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी हे व्यापारी झगडत आहेत. अशावेळी या व्यापाऱ्यांना विमा कंपन्या याच एकमेव आधार आहेत, असं या निवेदनात सुनील तटकरे यांनी नमूद केलं आहे.

पवारांसारखा निर्णय घ्या

शरद पवार यांनी 2005मध्ये केंद्रीय कृषी मंत्री असताना पूरग्रस्तांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. पूरात नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना तात्काळ 50 टक्के अर्थसहाय्य देण्याचे आदेश पवारांनी दिले होते. तुम्हीही त्याच धर्तीवर विमा कंपन्यांना आदेश देऊन व्यापाऱ्यांना 50 टक्के आर्थिक मदत मिळवून द्यावेत. जेणेकरून महाड, खेड, चिपळूण आणि रायगडमधील पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळेल, अशी विनंती तटकरे यांनी शेवटी केली आहे. (ncp-shiv sena mp urges nirmala sitharaman to release 50% of insured amount to flood-hit)

 

संबंधित बातम्या:

चिपळूणकरांच्या खात्यात अजूनही 10 हजार रुपये जमा नाही, सामंत म्हणतात, मंगळवारी 5 हजार रुपये जमा होणार

Weather Forecast: आयएमडीकडून ऑगस्ट सप्टेंबरसाठी हवामानाचा अंदाज जारी, महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी राहणार?

लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यासाठीही ‘वाझे ‘ हवेत का?, भाजपचा खोचक सवाल

(ncp-shiv sena mp urges nirmala sitharaman to release 50% of insured amount to flood-hit)