
वर वरात घेऊन वधूच्या दारात पोहोचला, आता आपलं लग्न होणार या विचारानं तो खूप आनंदी होता. मात्र लग्नाचे सर्व विधी पूर्ण होताच. नवरीचं कुटुंब नवरदेवाच्या कुटुंबाला म्हटलं की, आम्ही काही सामान विसरलो आहोत, आणि त्यांच्यासोबत त्यांनी नवरीला देखील नेलं. इकडे नवरदेव आणि त्याचं कुटुंब संपूर्ण रात्र नवरी परत येण्याची वाट पाहात राहीलं. मात्र सकाळी या प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं, जेव्हा नवरदेवाला आपल्या बायकोनं आपली फसवणूक केल्याचं कळालं. वधू लग्न होताच सर्व सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन लग्न मंडपातूनच आपल्या टोळीसोबत फरार झाली होती. तेव्हा नवरदेवानं घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आणि म्हणाला माझी पत्नी पळून गेली.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातलं आहे. येथील रहिवासी असलेल्या नान सिंह याचं लग्न होत नव्हतं. त्यामुळे नान सिंह यांचं कुटुंब चिंतेत होतं. एक दिवस नान सिंह याचा मोठा भाऊ एका मध्यस्थाला भेटला. मध्यस्थ असलेल्या कैलाश सिंह याने नान सिंह याच्यासाठी एक मुलगी असल्याचं सांगितलं. आसमा असं या मुलींचं नाव आहे, नान सिंह आणि त्याच्या कुटुंबाला मुलीचा फोटो दाखवण्यात आला, त्यांना मुलगी पसंत पडली, आदिवासी रिती रिवाजानुसार हे लग्न पार पडलं.
लग्नानंतर आम्ही काही सामान घरी विसरो आहोत, असं मुलीच्या कुटुंबानं नान सिंहच्या कुटुंबाला सांगितलं. त्यानंतर सोन्याचे दागिने आणि पैसे घेऊन या मुलीने आणि मुलीच्या टोळीने घटनास्थळावरून पलायन केलं. दुसऱ्या दिवशी घडलेला प्रकार मुलाच्या कुटुंबाच्या लक्षात आला. विशेष म्हणजे या प्रकरणात आसमाचा खरा पती हाच तिचा लग्नातला भाऊ बनला होता. तर इलाम सिंह हा या लग्नात मुलीचे वडील बनले होते. या लग्नासाठी हिरालाल नावाच्या व्यक्तीनं आपलं घर उपलब्ध करून दिलं होतं.
मात्र जेव्हा ही घटना लक्षात आली, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. नान सिंहच्या कुटुंबानं या प्रकरणात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये आसमा आणि तिच्या पतीचा देखील समावेश आहे.