सरकारने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, निर्मला सितारामन यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अखेर शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान यावर आता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सुरू होती. त्यासाठी दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर मोठं आंदोलन देखील उभारण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला त्यामुळे वातावरण अधिकच तापलं. विरोधी पक्षांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि विरोधक रस्त्यावर उतरले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर देखील जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी घोषणा कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती, तसेच आणखी एका मोठ्या मोर्चाचा इशारा देखील देण्यात आला होता.
दरम्यान दबाव वाढत असल्याने अखेर शनिवारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळालेलं मोठं यश मानलं जात आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी ही प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे.
नेमकं काय म्हटलं सितारामन यांनी?
सरकारने कधीही आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, तरुणांनी एखाद्या विशिष्ट विषयावर आवाज उठवणे ही प्रत्येक पिढीची ओळख राहिलेली आहे, आणि या गोष्टीला सकारात्मक भूमिकेतून पाहिलं पाहिजे. मी स्वत: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (JNU) ची विद्यार्थी आहे. मला माहिती आहे की, तरुण हे अशा मुद्द्यांवर फार संवेदनशील असतात, ज्या मुद्द्यांना ते चुकीच समजतात. सरकारचं काम हे विद्यार्थ्यांचं म्हणणं एकूण घेण आहे, त्यांच्या भावना समजून घेणं हे आहे. त्यानुसार सरकारने भूमिका घेतली पाहिजे. लोकशाहीमध्ये शांततेत केल्या जाणाऱ्या विरोधाचा सन्मान केला गेला पाहिजे, असं निर्मला सितारामन यांनी यावेळी म्हटलं आहे, त्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होत्या.