संसदेत शिक्षणमंत्र्यांच्या शपथविधीदरम्यान ‘नीट-नीट’चा नारा, गडकरी येताच विरोधकांनी बेंच वाजवले

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी संसद भवनातील गांधी पुतळ्यासमोर एकत्र येऊन सरकारचा निषेध केला. विरोधकांनी सरकारवर संविधान मोडल्याचा आरोप केलाय. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी संविधानावर केलेला हल्ला मान्य नसल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संसदेत शिक्षणमंत्र्यांच्या शपथविधीदरम्यान नीट-नीटचा नारा, गडकरी येताच विरोधकांनी बेंच वाजवले
shailesh musale | Updated on: Jun 24, 2024 | 3:42 PM

18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन आज (सोमवार) पासून सुरू झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, शिवराज चौहान, मनोहर लाल खट्टर यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. पण यावेळी संसद भवनात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. त्यांनी सरकारवर संविधान मोडल्याचा आरोप केलाय. आज लोकसभेत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या हातात संविधानाच्या प्रती दाखवल्या.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान शपथ घेण्यासाठी उठताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी नीट-नीट अशी घोषणाबाजी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शपथ घेणार असताना सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी ही बेंच वाजवला. संसदेच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या इतर नेत्यांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेच्या आवारात निदर्शने केली.

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी इंडिया आघाडीचे सर्व खासदार संसद भवनातील गांधी पुतळ्यासमोर जमले होते. यावेळी त्यांनी संविधानाची प्रती हातात घेऊन सरकारचा निषेध केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, लोकशाही परंपरा नष्ट होत आहे. या आंदोलनात समाजवादी पक्षही सहभागी झाला होता.

राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करत म्हटले की, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी संविधानावर केलेला हल्ला मान्य नाही, आम्ही हे होऊ देणार नाही. त्यामुळेच शपथ घेताना आम्ही संविधान हातात घेतले. तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय म्हणाले की, आमची मागणी संविधानाचे रक्षण करण्याची आहे. UCC ची ओळख करून दिली जाईल. सेक्युलॅरिझम टिकेल की नाही माहीत नाही. भारत आणि बांगलादेश यांच्यात करार झाला तेव्हा पश्चिम बंगाल सरकारला बोलावण्यात आले नाही. सर्व काही एकतर्फी केले गेले.

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस नाराज

येथे संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. उद्या आणीबाणीला ५० वर्षे पूर्ण होतील, असे ते म्हणाले. हा दिवस लोकशाहीवर काळा डाग होता. आणीबाणीच्या काळात देशाचे तुरुंगात रूपांतर झाले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक झाली असून पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आणीबाणीवर बोलण्याशिवाय काहीच उरले नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us