No-Confidence Motion Rejected | अखेर विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत फेटाळला, सभागृहात काय-काय घडलं?

अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली.

No-Confidence Motion Rejected | अखेर विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत फेटाळला, सभागृहात काय-काय घडलं?
Chetan Patil | Updated on: Aug 10, 2023 | 8:05 PM

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. यावेळी सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते आमनेसामने आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल अडीच तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरच्या घटनेवर भाष्य केलं. तसेच विरोधकांच्या विविध आरोपांवर प्रतिक्रिया दिलीय. मोदी यांचं भाषण सुरु असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. पण मोदींनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. अखेर मोदींच्या भाषणानंतर आवाजी मतदान पद्धतीने विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी सरकारी योजनांचा पाढा वाचला. तसेच आतापर्यंत काँग्रेसकडून झालेल्या घोटाळ्यांचा दावा त्यांनी विविध दावा केला. काँग्रेसच्या काळात अर्थव्यवस्था दहा ते बाराव्या जागेवर होती. पण आज देशाची अर्थव्यवस्थेवने टॉप फाईव्हमध्ये जागा बनवली. विरोधक 2028 मध्ये पुन्हा अविश्वासाचा प्रस्ताव आणतील तेव्हा देशाची अर्थव्यवस्था टॉप 3 मध्ये असेल, असा दावा नरेंद्र मोदी यांनी सभागृहात केला.

नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही टीका

नरेंद्र मोदी यांनी भाषणातून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मणिपूरच्या आजच्या स्थितीला काँग्रेसचं राजकारण जबाबदार असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच अविश्वास प्रस्तावच्या माध्यमातून सरकारी योजना पोहोचवण्याची संधी आम्हाला मिळाली, असं नरेंद्र मोदी म्हणाले. त्यांनी इंडिया आघाडीवरही टीका केली. इंडिया नाही तर घमंडिया आघाडी, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही टीका केली.

नरेंद्र मोदी यांनी यावेळी मणिपूरच्या घटेनवरही भूमिका मांडली. त्यांनी मणिपूरच्या नागरिकांना परिस्थिती पुन्हा पूर्ववत होईल, असं आश्वासन दिलं. “मी मणिपूरच्या लोकांना, तिथल्या माता, बघिणी आणि मुलींना सांगू इच्छितो देश तुमच्यासोबत आहे. हे सदन तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व मिळून या आव्हानावर मार्ग काढू. तिथे पुन्हा शांततेची स्थापना होईल. मी मणिपूरच्या लोकांना विश्वास देतो की, मणिपूर पुन्हा विकासाच्या मार्गाने पुढे जाईल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

 

Follow Us