मणिपूर प्रकरण : सत्य परिस्थिती समजून घ्या, धर्मेंद्र प्रधान यांचे विरोधकांना आव्हान

यावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधी पक्षावर घणाघात केला. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप प्रधान यांनी केला.

मणिपूर प्रकरण : सत्य परिस्थिती समजून घ्या, धर्मेंद्र प्रधान यांचे विरोधकांना आव्हान
| Updated on: Jul 24, 2023 | 8:59 PM

नवी दिल्ली : मणिपूर प्रकरणी संसदेत गोंधळ सुरू आहे. यामुळे संसद व्यवस्थित सुरू नाही. पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गोंधळ घातला. लोकसभेत मणिपूर प्रकरणी चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हंटलं. तर, विरोधक या प्रकरणी राजकारण करत असल्याचं केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं. मणिपूर प्रकरणी विरोधी पक्ष संसदेत चर्चा व्हावी, यासाठी आग्रही आहे. यावर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विरोधी पक्षावर घणाघात केला. विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप प्रधान यांनी केला.

धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूर प्रकरणी चर्चा करण्याची तयारी दाखवली. लोकसभा अध्यक्षांनीही चर्चा करण्याची विनंती केली. पण, राजकारण करणारे ही गोष्ट कशी समजतील.


मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र फिरवले

संसदेच्या पावसाळी सत्रापूर्वी मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र फिरवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. विरोधक म्हणतात, मणिपूर प्रकरणी संसदेत चर्चा व्हावी. सरकार चर्चेसाठी तयार आहे. पण, संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चा होऊ शकली नाही. विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला.

पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी हिसेसंदर्भात बोलले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील महिलांसोबत झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं. आरोपींना सोडले जाणार नसल्याचंही ते म्हणाले.

चर्चा करायला सत्ताधारी तयार

अमित शाह म्हणाले, संवेदनशील विषयावर चर्चेची मागणी केली. आम्ही सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत. विरोधी पक्ष चर्चा का करू देत नाही, हे मला माहीत आहे. विरोधी पक्षनेत्यांनी या संवेदनशील विषयावर चर्चा होऊ द्यावी. संपूर्ण देशासमोर खरं काय घडलं, हे पुढं आलं पाहिजे.

संबंधित विभागाचे मंत्री हे चर्चेत सहभागी होतील. चर्चा मुद्यांवर व्हावी. त्यात विरोधकांचे समाधान झाले पाहिजे. सार्वजनिक चर्चेतून जनतेच्या हिताचा विचार पुढं आला पाहिजे. असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हंटलं.