
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. दहशतवाद्यांच पालन पोषण करणाऱ्या पाकिस्तानातील अतिरेकी तळांना टार्गेट करण्यात आलं. भारताच्या या कारवाईने बिथरुन गेलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला चढवला. त्याचं इंडियन एअर फोर्सने चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या एअरबेसच नुकसान केलं. सोबतच रडार सिस्टिम उद्ध्वस्त केली. पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईचे सॅटलाइट फोटोंच्या माध्यमातून पुरावे मिळाले आहेत. या दरम्यान शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेऊन असलेल्या सॅटलाइटबद्दल इस्रोच्या चेअरमनच एक स्टेटमेंट समोर आलय. “देशाच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी रणनितीक उद्देशाने कमीत कमी 10 सॅटलाइट 24 तास काम करत आहेत. तुम्हाला आपल्या शेजाऱ्यांबद्दल सर्वकाही माहीत आहे. जर, आपल्याला आपली सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, तर सॅटलाइटच्या माध्यमातून सेवा करावी लागेल” असं इस्रोचे चेअरमन वी नारायणन म्हणाले.
आम्हाला आपल्या 7000 किलोमीटरमध्ये पसरलेल्या सागरी किनारा क्षेत्रावर लक्ष ठेवायचं असतं. उपग्रह आणि ड्रोन टेक्नोलॉजीशिवाय बऱ्याच गोष्टी साध्य करणं आपल्याला शक्य नाही. आतापर्यंत इस्रोने 127 सॅटलाइट लॉन्च केले आहेत. यात खासगी ऑपरेटर आणि शैक्षणिक संस्थांचे उपग्रह आहेत. भारताचे डझनभर हेरगिरी करणारे आणि टेहळणी उपग्रह आहेत. हे कार्टोसॅट आणि रिसॅट सीरीजमधले उपग्रह आहेत. फक्त हेरगिरीसाठी हे उपग्रह विकसित करण्यात आले आहेत. अवकाशातून टेहळणी क्षमता वाढवण्यासाठी पुढच्या पाच वर्षात 50 पेक्षा जास्त उपग्रह लॉन्च करण्याची भारताची योजना आहे. या उपग्रहांमुळे इंडियन आर्मी, नौदल आणि एअर फोर्सला शत्रूच्या प्रत्येक हालचालीची अजून बारीक माहिती मिळेल.
पाकिस्तानची पुरती पोलखोल
भारतीय सैन्यदलांनी रविवारी पत्रकार परिषद केली. यामध्ये पाकिस्तानात केलेल्या कारवाईचे पुरावे दिले. सैन्याने सॅटलाइट फोटोंद्वारे दाखवलं की, त्यांनी दहशतवादी तळ आणि पाकिस्तानी एअरबेसला कसं टार्गेट केलं. दहशतवादी तळ नष्ट झाल्याच फोटोंमध्ये स्पष्ट दिसलं. सॅटलाइट फोटोंमुळे पाकिस्तानलाही काही लपवता येणार नाही आणि फॉरेन मीडियाला सुद्धा पुरावे दिलेत. सॅटलाइट फोटोंनी पाकिस्तानची पुरती पोलखोल केली आहे.