Vande Bharat Express : या मार्गावर धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसचे डबे आता कायमस्वरुपी १६ वरुन २० होणार, प्रवासी क्षमतेत मोठी वाढ
देशाच्या महत्वाच्या मार्गावर धावणाऱ्या वंदेभारत एक्सप्रेसच्या १६ डब्यांचे रुपांतर आता कायमस्वरुपी २० डब्यात करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. यामुळे प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

वंदेभारत रेल्वेमुळे प्रवाशांच्या सुविधेत वाढ झाली असून प्रवाशांना अधिक आरामदायी आणि वेगवान प्रवासाचा अनुभव मिळत आहे. देशाच्या ४२ व्या वंदेभारत एक्सप्रेस ( Train No. 22961/22962 ) ला आता कायम स्वरुपात १६ च्या ऐवजी २० डब्यांची सोबत देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. येत्या २८ एप्रिल २०२६ पासून मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद धावणाऱ्या या प्रीमियम ट्रेनला कायम स्वरुपाती २० डब्यांची जोड मिळणार आहे. त्यामुळे जादा प्रवाशांची सोय आता कायमस्वरुपी होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते अहमदाबात वंदेभारत एक्सप्रेसला( Train No. 22961/22962 ) आधी पासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रीमियम ट्रेनला आता २८ एप्रिल २०२६ पासून २० डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ मार्च २०२४ रोजी हिरवा झेंडा दाखवला होता. त्यावेळी वंदेभारत एक्सप्रेस ही ट्रेन १६ डब्यांची होती. आता या ट्रेनला २० डबे केल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
जादा आसने आणि सेम स्पीड
जादा गर्दीमुळे पश्चिम रेल्वेने या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदेभारत एक्सप्रेसला तात्पुरते चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला होता. या चार नवीन एसी चेअर कार डब्यांची वाढ केल्याने प्रवाशांची क्षमता २७८ ने वाढली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि टेक्सटाईल आणि इंडस्ट्रीयल हब बनू पाहणाऱ्या अहमदाबाद या शहरांना जोडणाऱ्या या ट्रेनला मोठी मागणी आहे.
या ट्रेनचे डब्यात जरी वाढ झाली असली तर गाडीचे वेळापत्रक आणि थांबे कायम आहेत. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद हे ४९१ किमीचे अंतर ही ट्रेन ५ तास ४० मिनिटात कापते.
ट्रेन क्रमांक : 22961 (Mumbai Central to Ahmedabad) | 22962 (Ahmedabad to Mumbai Central)
प्रवासाचा वेळ : 5 तास आणि 40 मिनिटे
ऑपरेटिंग डे : आठवड्यातील सहा दिवस ( रविवार वगळून )
थांबे कोणते ? : मुंबई सेंट्रल, बोरीवली, वापी, सुरत आणि वडोदरा
जादा मागणी असणाऱ्या मार्गावर डब्यांची वाढ करण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. वंदेभारत एक्सप्रेसला १६ वरुन २० डबे केल्याने वंदे भारत एक्सप्रेसची एकूण क्षमता १,४०० पर ट्रीप केली आहे.