PM Modi attack on Congress : शिमल्यात PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला; म्हणाले काँग्रेसने भ्रष्टाचारासमोर टेकले गुडघे

| Updated on: May 31, 2022 | 3:25 PM

दरम्यान याच्याआधी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. तर किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता म्हणून 21,000 कोटी रुपये जारी केले.

PM Modi attack on Congress : शिमल्यात PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला; म्हणाले काँग्रेसने भ्रष्टाचारासमोर टेकले गुडघे
पंतप्रधान मोदी
Image Credit source: tv9
Follow us on

शिमला : केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मंगळवारी शिमला येथे सभेला (Shimla Rally)संबोधित केले. यावेळी त्यांनी, काँग्रेसवर हल्ला चढवला. तसेच ते म्हणाले, 2014 पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचाराला प्रशासनात स्थान दिले होते. तर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या (Bharatiya Janata Party) नेतृत्वाखालील सरकारने भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. तसेच, पीएम मोदींनी आज किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता म्हणून 21,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले.

तसेच आपल्या सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शिमल्याच्या रिज मैदानावर आयोजित सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या यादीतून नऊ कोटी बनावट नावे काढून टाकली आहेत. ते म्हणाले, “प्रधानमंत्री आवास योजना असो, शिष्यवृत्ती किंवा इतर कोणतीही योजना असो, जनतेला थेट फायदा व्हावा यासाठी आम्ही भ्रष्टाचार नष्ट केला आहे.” ते म्हणाले, “आम्ही थेट लाभ हस्तांतरणाद्वारे विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 22 लाख कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे.”

आता देशाच्या सीमा अधिक सुरक्षित

आपल्या भाषणात नाव न घेता काँग्रेसवर हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले, 2014 पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचार हा प्रशासनाचा अत्यावश्यक भाग म्हणून स्वीकारला होता, त्यानंतर भ्रष्टाचाराशी लढण्याऐवजी सरकार त्याला बळी पडले. हे सगळं देश पाहत होता. गरजू लोकांपर्यंत योजना पोहोचण्यापूर्वीच त्यातील पैशांची लूट होत होती. याचबरोबर ते म्हणाले की, आता देशाच्या सीमा 2014 पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित आहेत.

इतरांना मदतीचा हात

कोविड-19 या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती देताना ते म्हणाले की, देशात कोविड-19 विरोधी लसींचे सुमारे 200 कोटी डोस देण्यात आले आहेत. भारताने विविध देशांना अँटी-कोविड-19 लसींची निर्यात केली आणि हिमाचल प्रदेशच्या बद्दी औद्योगिक युनिटने त्या डोसच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे पंकप्रधान मोदी म्हणाले. तसेच याच्याआधी भारताला इतरांच्या पुढे हात पसरावे लागत होते. मात्र आता तशी स्थिती राहलेली नाही. भारत आता इतरांना मदत करण्यासाठी मैत्रीचा हात पुढे करत आहे. जसे अनेक देशांना कोविड-19 विरोधी लस उपलब्ध करून देण्यात आली.

दरम्यान याच्याआधी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. तर किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता म्हणून 21,000 कोटी रुपये जारी केले. पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी त्यांच्या सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त शिमला येथे पोहोचले. हिमाचल प्रदेशच्या राजधानीतील मॉल रोडवर पोहोचल्यानंतर ते मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यासोबत सकाळी 11.30 च्या सुमारास रिज मैदानाकडे रवाना झाले.