Imran Pratapgarhi : कोण आहेत इम्रान प्रतापगढी? ज्यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी पसरलीय!

| Updated on: May 30, 2022 | 12:50 PM

Imran Pratapgarhi : इमरान प्रतापगढी हे प्रतापगढ जिल्ह्यातील बेल्हा येथील रहिवासी आहेत. 6 ऑगस्ट 1987 रोजी शमशेरगंज येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण नाव मोहम्मद इमरान खान असं आहे.

Imran Pratapgarhi : कोण आहेत इम्रान प्रतापगढी? ज्यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराजी पसरलीय!
कोण आहेत इम्रान प्रतापगढी? ज्यांना राज्यसभेचं तिकीट दिल्यानं महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाराज पसरलीय!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: काँग्रेसने राज्यसभेसाठी उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेवर काँग्रेस कुणाला पाठवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, काँग्रेसने उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते इमरान प्रतापगढी (Imran Pratapgarhi) यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची (rajya sabha) उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेस हायकमांडच्या या निर्णयामुळे राज्यातील काँग्रेसमध्येही खदखद निर्माण झाली आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी ट्विट करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे नगमा यांनी इमरान प्रतापगढी यांचं नाव घेऊन नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे इम्रान प्रतापगढी अचानक चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या (congress) तिकीटावर यापूर्वी प्रतापगढी लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मात्र, त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते आणि ऊर्दू शायर म्हणून प्रसिद्ध असलेल्या इम्रान प्रतापगडी यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.

इमरान प्रतापगढी हे प्रतापगढ जिल्ह्यातील बेल्हा येथील रहिवासी आहेत. 6 ऑगस्ट 1987 रोजी शमशेरगंज येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचं संपूर्ण नाव मोहम्मद इमरान खान असं आहे. प्रतापगढ जिल्ह्याच्या नावावरून त्यांनी इम्रान प्रतापगढी हे नाव धारण केलं. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठीतून हिंदी भाषेतून एमए केलं आहे. त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमाही केला आहे. त्यांचे वडील डॉ. इलियास हे पेशाने डॉक्टर होते. प्रतापगढी चार भावंडांमध्ये सर्वात थोरले आहेत. 2019मध्ये त्यांचं राजकीय करिअर सुरू झालं. त्यांना काँग्रेसने मुरादाबाद लोकसभेचं तिकीट दिलं होतं.

हे सुद्धा वाचा

राज बब्बर यांचा पत्ता कापून तिकीट

मुरादाबादमधून प्रसिद्ध सिनेअभिनेते राज बब्बर यांना तिकीट मिळणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर राज बब्बर यांना फतेहपूरमध्ये शिफ्ट व्हावं लागलं. त्यांच्या जागी प्रतापगढींना तिकीट देण्यता आलं.

एक भेटीने आयुष्य बदललं

नोव्हेंबर 2018मध्ये एका कार्यक्रमात त्यांची राहुल गांधींसोबत भेट झाली. केवळ 25 मिनिटाची ही भेट ठरली होती. मात्र, जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा दीड तास ही चर्चा सुरू होती. शायरीपासून ते देशाच्या राजकीय परिस्थितीवर या भेटीत चर्चा झाली. राहुल गांधींचा साधेपणा आणि त्यांच्या दुरदृष्टीकोणाने मला प्रभावीत केलं. त्यामुळेच मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, असं त्यांचं म्हणणं आहे.

राहुल गांधींचे निकटवर्तीय

प्रतापगढी हे राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच त्यांना भारतीय काँग्रसे समितीच्या अल्पसंख्याक विभागाचं चेअरमनपद देण्यात आलं होतं. प्रतापगढी यांचा राजकीय प्रवास अवघ्या तीन वर्षाचा आहे. बिहार, आसाममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रतापगढी हे काँग्रेसचे स्टारप्रचारक होते.

शायर म्हणून लोकप्रिय

प्रतापगढी हे साहित्य आणि कला क्षेत्राशी संबंधित आहेत. यूपी, बिहारमध्ये ते शायर म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकीय आणि वर्तमान परिस्थितीवरील त्यांच्या शायरी लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही ते आपल्या शायरीतून टीका करत असतात. एकेकाळी कुमार विश्वास कवी म्हणून जसे लोकप्रिय झाले होते, तसेच प्रतापगढीही लोकप्रिय आहेत. इयत्ता पाचवीला असल्यापासूनच प्रतापगढी यांनी शेरोशायरी करण्यास सुरुवात केली होती. मदरसा, पॅलेस्टाईन, हम मुसलमान आणि नजीब या त्यांच्या रचना अधिक लोकप्रिय आहेत.

फेसबूक आणि ट्विटरवर स्टार

फेसबुकवर त्यांचे दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर ट्विटरवर त्यांचे साडे तीन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तर इमरान प्रतापगढी यांच्या नावाने अनेक ग्रुप तयार करण्यात आले आहेत.

जाईल तिथे गर्दी

गर्दी आणि प्रतापगढी हे समीकरण ठरलेलंच आहे. प्रतापगढी जिथे जातात तिथे त्यांच्यासोबत हजारो लोक असतात. त्यांच्या भोवती होणाऱ्या या गर्दीचे फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवरही पाहता येतील. त्यांच्या या लोकप्रियतेमुळेच लोकसभा निवडणुकीत राज बब्बर यांचा पत्ता कापण्यात आला होता.