भारताबाबतची भूमिका बदलातच मालदीवला मिळाले रिटर्न गिफ्ट, मोदींकडून मुइज्जूंना मोठी भेट

मालदीव सध्या आर्थिक संकटात असताना मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. भारताच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मोहम्मद मुइज्जू यांना आता भारताची किंमत कळाली आहे. त्यामुळे ते भारत दौऱ्यावर आलेत. आज त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असता भारताकडून त्यांना मोठी भेट मिळाली आहे.

भारताबाबतची भूमिका बदलातच मालदीवला मिळाले रिटर्न गिफ्ट, मोदींकडून मुइज्जूंना मोठी भेट
shailesh musale | Updated on: Oct 07, 2024 | 6:27 PM

India maldive : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेल्या नंतर मालदीवला त्याचा मोठा फटका बसला. त्यानंतर आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्यात भेट झाली. मालदीवसाठी ही भेट महत्त्वाची आहे. कारण नव्या सरकारमुळे दोन्ही देशांमधील संबंध खराब झाले होते. भारतीय पर्यटकांनी बहिष्कार टाकल्याने याचा सरळ फटका त्यांच्या अर्थव्यवस्थेला बसला. पण तरी देखील भारताने मालदीव सोबत संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीव हा आपला मित्र देश असल्याचे म्हटले आहे. भारताने नेहमीच शेजारी म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. या बैठकीत भारत आणि मालदीवमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सत्तेत येण्याआधी पासून मुइज्जू यांचा अधिक कल चीनकडे होता.

मालदीवची आर्थिक परिस्थिती बिघडताच मुइज्जू यांना ही भारताचं महत्त्व कळलं. आता त्यांच्या भारत दौऱ्यात काही करारांवर सहमती दर्शवत मुइज्जू यांना रिटर्न गिफ्ट दिले आहे. भारत आणि मालदीव यांनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी $400 दशलक्ष किमतीच्या चलन अदलाबदलीच्या करारावर स्वाक्षरी झाली. मालदीवला यामुळे परकीय चलनाच्या साठ्याशी संबंधित समस्या हाताळण्यास मदत होईल.

मालदीवमध्ये रुपे कार्ड लॉन्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमध्ये रुपे कार्ड लॉन्च केलंय. रुपे कार्ड लॉन्च करताना पीएम मोदी म्हणाले की, आगामी काळात भारत आणि मालदीव हे यूपीआयच्या माध्यमातून जोडले जातील. चलन स्वॅप आणि रुपे कार्ड व्यतिरिक्त, दोन्ही देशांमध्ये इतर अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.

हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत भारताने मालदीवला 70 घरे सादर दिली. एक्झिम बँकेच्या आर्थिक सहाय्याने ही घरे बांधण्यात आली आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की आज आम्ही पुनर्विकसित हनीमधू विमानतळाचे उद्घाटन केले. आता ग्रेटर मेल कनेक्टिव्हिटी प्रकल्पालाही गती दिली जाणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही थिलाफुशी येथे नवीन व्यावसायिक बंदराच्या विकासाला पाठिंबा देऊ. भारत आणि मालदीव यांनी त्यांचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुइज्जू यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून भारत आणि मालदीवमधील संबंध ताणले गेले. ‘इंडिया आऊट’ मोहिमेअंतर्गत मुइज्जू यांनी  राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली होती आणि या वर्षी मेपर्यंत द्वीपसमूहात तैनात केलेले आपले लष्करी कर्मचारी मागे घेण्यास सांगितले होते. मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींवर टीका केल्याने द्विपक्षीय संबंध आणखी ताणले गेले होते. मात्र, मुइज्जूच्या भारतविरोधी भूमिकेत बदल झाला आहे. मुइज्जू यांनी भारतीय पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या मंत्र्यांनाही बडतर्फ केले होते.

मालदीवला मोठा दिलासा

भारतासोबत आता त्यांनी पुन्हा एकदा मैत्रिचा हात पुढे केल्याने गंभीर आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्या मालदीवला भारताने मालदीवला 50 दशलक्ष डॉलर्सचे ट्रेझरी बिल आणखी एका वर्षासाठी वाढवून महत्त्वपूर्ण अर्थसंकल्पीय मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मालदीवला मोठा दिलासा मिळाला आहे.

Follow Us