Punjab Clash : पतियाळात अखेर कर्फ्यू, नेमकी कोणती शिवसेना आहे जी बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतेय, खलिस्तान समर्थकांशी पंगा घेतला

बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना खलिस्तान विरोधात आयोजित एका मोर्चावेळी दोन गट आमनसामने आले. दोन गटात हिंसेला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला.

Punjab Clash : पतियाळात अखेर कर्फ्यू, नेमकी कोणती शिवसेना आहे जी बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतेय, खलिस्तान समर्थकांशी पंगा घेतला
पंजाबच्या पटियालात मोठा हिंसाचार
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 29, 2022 | 7:55 PM

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) पतियाळात मोठ्या हिंसाचारानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पतियाळाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजल्या पासून 30 एप्रिल सकाळी 6 पर्यंत संचारबंदी (Curfew) लागू केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय हेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय. बंदी घालण्यात आलेली दहशतवादी संघटना खलिस्तान विरोधात आयोजित एका मोर्चावेळी दोन गट आमनसामने आले. दोन गटात हिंसेला सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. यावेळी मोठी दगडफेक (Stone Pelting) झाल्याचंही कळतंय. या दगडफेकीत काही लोक जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय.

महत्वाची बाब म्हणजे हा वाद बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक गट आणि खलिस्थान समर्थक शीख गटात हा संघर्ष झाल्याचं सांगण्यात येत आहे. खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने शुक्रवारी खलिस्तानचा स्थापना दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी पंजाबमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खलिस्तानविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शुक्रवारी दुपारी दोन्ही गटांनी मोर्चा काढल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक सुरु झाली. त्यात अनेकजण जखमी झाल्याचीही माहिती मिळतेय.

मुख्यमंत्री भगवंत मान यांचं शांततेचं आवाहन

सध्या पतियाळातील स्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक राकेश अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आम्ही बाहेरुन पोलिसांची कुमक मागवली आहे. पोलीस उपायुक्तांनी शांती समितीची बैठक बोलावली आहे. त्यांनी सांगितलं की शांतता अबाधित राखणं हीच आमची प्राथमिकता आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. मान पोलीस महासंचालकांच्या संपर्कात आहेत. ‘पटियालातील हिंसाचाराची घटना दुर्दैवी आहे. मी डीजीपींसोबत चर्चा केली आहे. परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. आम्ही स्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहोत. राज्यात कुणालाही अशांतता निर्माण करु देणार नाही’, असं ट्वीटही मान यांनी केलं आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका – पोलीस

पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार काही खोडकर घटकांनी काही अफवा पसरवल्या होत्या त्यामुळे हा हिंसाचार घडला. आम्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे. आम्ही पटियाला शहरात प्लॅग मार्च करत आहोत. दरम्यान, हिंसाचारात किती लोक जखमी झाले याची पाहणी केली जात आहे. काही अफवांमुळे तणाव वाढला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं ते म्हणाले. पटियालाच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी शांतता राखण्याचं आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं आहे.