Rahul Gandhi: सरकारला सिनेमाच्या प्रमोशनमधून वेळ कुठाय?; काश्मीरमधील हिंदुंच्या हत्येवरून राहुल गांधी ओवैसींनी भाजपला घेरलं

Rahul Gandhi: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. काश्मिरी पंडितांचं पलायन होत आहे. त्याला पंतप्रधानच जबाबदार असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे.

Rahul Gandhi: सरकारला सिनेमाच्या प्रमोशनमधून वेळ कुठाय?; काश्मीरमधील हिंदुंच्या हत्येवरून राहुल गांधी ओवैसींनी भाजपला घेरलं
सरकारला सिनेमाच्या प्रमोशनमधून वेळ कुठाय?; काश्मीरमधील हिंदुंच्या हत्येवरून राहुल गांधी ओवैसींनी भाजपला घेरलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2022 | 6:09 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये (Jammu Kashmir Killings) हिंदुंच्या हत्यांच्या घटना घडत आहे. अतिरेकी रोज दोन चार हिंदू आणि काश्मिरी पंडितांची हत्या करत आहेत. राजरोसपणे दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या केल्यानंतर अतिरेकी पसार होत आहेत. आजही बँक मॅनेजर विजय कुमार यांची बँकेत घुसून हत्या करण्यात आली. ते राजस्थानचे रहिवासी होते. कुलगाममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रोज होणाऱ्या या टार्गेट किलिंगच्या घटनांमुळे सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे काश्मिरी पंडित आणि अन्य हिंदू काश्मीरमधून पलायन करत आहेत. त्यामुळे काश्मीरमधील हिंदुंच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi)आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजप सरकारला घेरलं आहे. सरकार सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनमधून सरकारला वेळ कुठाय? असा सवाल राहुल गांधी आणि ओवैसी यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करून हा हल्लाबोल केला आहे. बँक मॅनेजर, शिक्षक आणि अनेक निरपराध लोक रोज मारले जात आहेत. काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. ज्यांना त्यांचं संरक्षण करायचं आहे. त्यांना सिनेमाच्या प्रमोशनमधून वेळ मिळत नाहीये. भाजपने काश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवले आहे. पंतप्रधान महोदय, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरीत पावले उचला, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

 

काश्मिरी पंडितांच्या पलायनला मोदीच जबाबदार

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. काश्मिरी पंडितांचं पलायन होत आहे. त्याला पंतप्रधानच जबाबदार असल्याचं ओवैसी यांनी म्हटलं आहे. काश्मिरी पंडितांचं दुसरं पलायन सुरू आहे. त्याला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. त्यांचं सरकार 1989च्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे. काश्मीर खोऱ्यातील नेत्यांकडे काळीज नाहीये. त्यांच्याकडे कोणतीही राजकीय वैधता नाहीये. मोदी सरकार तर केवळ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये गुंतली आहे, अशी टीका ओवैसी यांनी केली आहे.

 

हिंदू टार्गेट

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये हिंदू आणि काश्मिरी पंडितांना टार्गेट केलं जात आहे. खास करून नोकरदार हिंदूंना अधिक टार्गेट केलं जात आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने काश्मीरमध्ये परिसीमन केलं आहे. त्यामुळे मतदारसंघांमध्ये बदल झाले आहेत. यात काश्मिरी पंडितांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.