Raghuram Rajan: आकड्यात गडबड…मोदी सरकारच्या GDP ग्रोथवर माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचा सवाल
Rghuram Rajan On Narendra Modi: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Raghuram Rajan RBI: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या जीडीपी वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढत असताना, भारत तरुणांसाठी पुरेशा नोकऱ्या का निर्माण करत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला. राजन यांनी म्हटले आहे की, त्यांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबद्दल शंका आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नर यांनी सांगितले की, “अशा वेगवान आर्थिक वाढीबद्दल काही खऱ्या चिंता आहेत.”
या मुलाखतीत राजन यांनी प्रश्न विचारला की, “अर्थव्यवस्था खरोखरच इतक्या वेगाने वाढत असताना, अधिक नोकऱ्या आणि अधिक गुंतवणूक का होत नाही? हे वाढीचे आकडे खरे आहेत का? जर वाढीचे आकडे खरे नसतील, तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच प्रश्नचिन्हात आहे. काही विसंगती आहेत ज्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे – जसे की, जर आपण इतक्या वेगाने वाढत आहोत, तर आपण अधिक नोकऱ्या का निर्माण करत नाही? आणि चांगल्या नोकऱ्या का नाहीत? आणि गुंतवणूक का होत नाही? आपले उद्योगपती गुंतवणूक करण्यास इतके कचरत का आहेत?” मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक (FDI) का येत नाही? आपण बराच काळ आकड्यांशी खेळून एक किंवा दुसरे मत बनवू शकतो. याव्यतिरिक्त, त्यांनी विचारले की सरकार अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे का? ज्या क्षेत्रांमध्ये आपले अस्तित्व आहे, त्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत?
“जर दोन्ही प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ असतील, तर मला वाटते की आपल्यासमोर एक मूलभूत समस्या आहे. कारण ही आपल्या लोकसंख्या लाभांशाची वेळ आहे. जर आपण प्रत्येकासाठी पुरेसे रोजगार निर्माण करत नसू, तर हा ‘लोकसंख्या लाभांश’ गमावण्याचा धोका आहे.” मात्र, रघुराम राजन यांनी देशातील नोकरीच्या संकटाकडे लक्ष वेधण्याची ही पहिली वेळ नाही. ‘द फ्रंटलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत, आरबीआयचे माजी गव्हर्नर म्हणाले की, “खासगी क्षेत्रात पुरेशा नोकऱ्या निर्माण होत नाहीत. लोक आता नागरी सेवेतील नोकऱ्या केवळ लोकांची सेवा करण्याच्या इच्छेमुळे निवडत नाहीत, तर त्यांना या नोकऱ्या सर्वाधिक आवडतात म्हणून निवडतात.”