बिहारच्या राजकारणात सचिन तेंडुलकर केंद्रस्थानी, नेमकं कसं?

| Updated on: Feb 05, 2021 | 9:21 PM

बिहारच्या राजकारणात सध्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा केंद्रस्थानी आहे (Sachin Tendulkar in Bihar Politics)

बिहारच्या राजकारणात सचिन तेंडुलकर केंद्रस्थानी, नेमकं कसं?
Follow us on

पाटणा : बिहारच्या राजकारणात सध्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा केंद्रस्थानी आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला सचिन तेंडुलकर याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. “भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन अनेकांनी त्याच्यावर टीका केली. बिहारचे आरजेडी नेता शिवानंद तिवारी यांनी तर सचिनने रिहानाला प्रत्युत्तर दिल्याने भारतरत्न पुरस्काराचा अपमान झाला, असा दावा केला. त्यांच्या या टीकेनंतर बिहारमधील राजकारण ढवळून निघालं आहे (Sachin Tendulkar in Bihar Politics).

“शेतकऱ्यांना ट्विटचं राजकारण कळत नाही. त्यांना ग्रेटा थनबर्ग आणि रिहाना माहिती नाहीत. त्यांच्या ट्विटला सचिन तेंडुलकरने उत्तर देणं हा भारतरत्न पुरस्काराचा अपमान आहे”, असं शिवानंद तिवारी म्हणाले (Sachin Tendulkar in Bihar Politics).

“सचिन तेंडुलकरला जेव्हा भारतरत्न देण्यात आला तेव्हा देखील मी विरोध केला होता. आता मी पुन्हा एकदा सांगतोय, सचिन तेंडुलकर सारख्या लोकांना भारतरत्न पुरस्कार देणं चुकीचं आहे. भारतरत्न मिळालेला व्यक्ती कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करत नाही”, असंदेखीलशिवानंद तिवारी म्हणाले.

“शिवानंद तिवारी यांनी सचिन तेंडुलकरवर सडकून टीका केल्यानंतर भाजप आणि जेडीयू नेत्यांनी सचिनच्या बाजूने फिल्डिंग करण्यास सुरुवात केली. बिहारच्या सत्ताधारी पक्षाने शिवानंद तिवारी यांच्यावर निशाणा साधला. विदेशातील सेलिब्रेटिंचा सन्मान आणि देशाच्या महान खेळाडूचा अपमान फक्त आरजेडीचे नेताच करु शकतात”, असं जेडीयू प्रवक्ता राजीव रंजन प्रसाद म्हणाले.

“सचिन तेंडुलकरने देशातील कोट्यवधी लोकांना आनंद दिला आहे. त्यामुळे शिवानंद तिवारी यांनी फक्त सचिनचाच नाही तर त्या कोट्यवधी लोकांचाही अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही तर आरजेडीचे नेता तेजस्वी यादव यांनी देशातील लोकांच्या भावना जाणून शिवानंद तिवारी यांच्या विरोधात कठोर पाऊल उचलावं”, अशी मागणी राजीव रंजन प्रसाद यांनी केला.

दुसरीकडे भाजपचे प्रदेश प्रवक्ते निखिल आनंद यांनीदेखील शिवानंद तिवारी यांच्यावर घणाघात केला. “ज्यांना भारतरत्न मिळाला ते सर्व सन्माच्या पात्र आहेत. मात्र, शिवानंद तिवारी हे वृद्ध असल्या कारणाने त्यांचं मानसिक स्थैर्य खालावलं आहे. त्यांना चांगल्या मनोरुग्ण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. त्यांच्या वक्तव्याप्रकरणी तेजस्वी यादव यांनी माफी मागावी”, असं निखिल आनंद म्हणाले.

बिहारचं राजकाण कोणत्याही कारणाने तापू शकतं. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार असं वातावरण निर्माण झालं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुशांतचं आत्महत्या प्रकरणावरुन प्रचंड घमासान बघायला मिळालं होतं. त्यानंतर आता सचिन तेंडुलकरच्या ट्विटवरुन राजकारण तापलं आहे.

सचिन तेंडुलकरचं ट्विट

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

हेही वाचा : भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर