तेव्हा मी काहीच बोललो नाही… नंतर ते माझ्यासाठी आले… पास्टर निमोलरच्या कवितेतून राऊतांचा सावधानतेचा इशारा

| Updated on: Feb 09, 2022 | 2:50 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज लेटर बॉम्ब टाकला आहे. थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून राऊत यांनी ईडी आणि भाजपचे वाभाडे काढले आहेत. तसेच या पत्रातून महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्राची माहितीही देण्यात आली आहे.

तेव्हा मी काहीच बोललो नाही... नंतर ते माझ्यासाठी आले... पास्टर निमोलरच्या कवितेतून राऊतांचा सावधानतेचा इशारा
शिवसेना नेते संजय राऊत
Follow us on

नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज लेटर बॉम्ब टाकला आहे. थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (venkaiah naidu) यांना पत्र लिहून राऊत यांनी ईडी आणि भाजपचे वाभाडे काढले आहेत. तसेच या पत्रातून महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्राची माहितीही देण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून आघाडीच्या नेत्यांविरोधात तपास यंत्रणांच्या कारवायांचा सिसेमिरा मागे लावण्यात आला आहे, असं राऊत यांनी या पत्रात म्हटलं आहे. याच पत्रात राऊत यांनी प्रसिद्ध जर्मन कवी पास्टर मार्टीन निमोलर (pastor Martin Niemöller) यांची First they came… ही कविता उद्धृत केली आहे. या कवितेतून राऊत यांनी महाविकास आघाडीतील सहकाऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. तसेच आपण सर्वांनी बोललं पाहिजे, असंच राऊतांनी या कवितेतून सहकाऱ्यांना सूचवलं आहे. कालच राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना मीच काय बोलण्याचा ठेका घेतला आहे का? असा उद्वेग व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातील कवितेतून सूचक भावना व्यक्त केली आहे.

काय आहे कविता?

आधी ते समाजवाद्यांसाठी आले
तेव्हा मी काहीच बोललो नाही
कारण मी समाजवादी नव्हतो!

नंतर ते ट्रेड युनियनवाल्यांसाठी आले,
आणि मी काहीच बोललो नाही,
कारण मी ट्रेड युनियनमध्ये नव्हतो!

नंतर ते आले ज्यूंसाठी
तेव्हाही मी काहीच बोललो नाही,
कारण मी ज्यू नव्हतो!

नंतर ते माझ्यासाठी आले
तेव्हा माझ्यासाठी बोलेल
असे कोणीच उरले नव्हते!!!

पास्टर निमोलर कोण होते?

पास्टर मार्टिन निमोलर हा जर्मन कवी होते. ते धर्मगुरू आणि लुथरन फादर होते. त्यांनी ही कविता नाझीच्या कौर्याने परिसिमा गाठल्यानंतर  लिहिली होती. नाझी विरोधात उठाव देण्यासाठीच त्यांनी ही कविता लिहिली आहे.

निमोलर हे रुढीपरंपरावादी होते. सुरुवातीच्या काळात ते हिटलरचे समर्थक होते. त्यांना कन्फेशन चर्चच्या संस्थापकांपैकी ते एक होते. मात्र, सर्वच चर्चवर नाझींनी नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केल्याने निमोलर यांनी त्याचा कडाडून विरोध केला. त्यामुळे त्यांना 1938 ते 1945 दरम्यान छळछावण्यात ठेवण्यात आलं होतं. त्यातूनही त्यांची नंतर सुटका झाली होती. मात्र, नाझींचा छळ सहन करणाऱ्यांना पुरेशी मदत करू शकलो नाही याची त्यांना कायम खंत होती. ही सल त्यांनी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. 1950च्या दशकात त्यांनी शांततावादी आणि युद्धविरोधी कार्यकर्ता म्हणून काम केलं. 1966 ते 1972 पर्यंत ते वॉर रेसिस्टर्स इंटरनॅशनलचे ते उपाध्यही होते. व्हिएतनाम युद्धाच्यावेळी त्यांनी हो चि मिन्ह यांची भेट घेतली होती. ते अणूबॉम्बविरोधी होते. अणूबॉम्बचा वापर केला जाऊ नये म्हणून त्यांनी हयातभर प्रचार केला होता.

संबंधित बातम्या:

VIDEO: माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली, संजय राऊतांच्या लेटरबॉम्बने खळबळ

VIDEO: ‘मुंबईत शिवसेनाच दादा!,’ संजय राऊतांची डरकाळी; ईडीविरोधात सनसनाटी आरोप

‘आम्ही जेलमध्ये गेलो, तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू’ राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचा थेट प्रहार, काय म्हणाले?