Protest Against CM : बापरे! मुख्यमंत्रीच 4 तास ओलिस, का झाली जनता इतकी नाराज

| Updated on: May 27, 2023 | 7:34 PM

Protest Against CM : जनतेचा रोष काय असतो, हे उभ्या भारताने बघितले. नाराज लोकांनी मुख्यमंत्र्यांना चक्क चार तास ओलिस ठेवले.

Protest Against CM : बापरे! मुख्यमंत्रीच 4 तास ओलिस, का झाली जनता इतकी नाराज
Follow us on

नवी दिल्ली : हरियाणात विधानसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुका लोकसभेच्या निवडणुकांसोबत अथवा मागे-पुढे कधी लागू शकतात. 2024 साठीची रंगीत तालीम सुरु झाली आहे. जनतेच्या मनात काय आहे, याची चाचपणी करण्याचे काम सुरु आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana CM Manohar Lal Khattar) हे सध्या जनसंवाद कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत. पण त्यांना अनेक ठिकाणी लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी महेंद्रगडमध्ये तर जनतेचा रोष इतका वाढला की, त्यांनी मुख्यमंत्री खट्टर यांना चार तास ओलिस ठेवले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, अशी कोणती मागणी होती की त्यासाठी स्थानिकांनी थेट मुख्यमंत्र्यांना चार तास अडवून ठेवले.

स्थानिक प्रतिनिधी हतबल
लोक ऐकण्याच्या बिलकूल मनस्थितीत नव्हते. मुख्यमंत्र्यांना घेराव घातल्याने सर्वच जण चिंतातूर झाले. स्थानिक आमदार, इतर प्रतिनिधी त्यांच्या मदतीला धावले. पण हा प्रयत्न निष्फळ ठरला. लोकांनी अक्षरशः त्यांना पिटाळून लावले. मुख्यमंत्र्यांना लोकांनी टाकलेले कडे फुटता फुटेना. पण ज्या मागणीसाठी हा प्रकार सुरु होता. ती मागणी मान्य करण्याशिवाय तणाव काही निवळला नाही.

सध्या BJP-JJP युती
हरियाणात सध्या भारतीय जनता पार्टी (BJP) आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांच्या युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे त्यांचा दुसरा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. राज्यात खट्टर सरकारला 9 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण या सरकारविषयी जनतेच्या मनात रोष असल्याचे या प्रकारावरुन दिसून आले.

हे सुद्धा वाचा

काय घडली घडामोड
शुक्रवारी महेंद्रगड येथे जनसंवाद कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर दाखल झाले. तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी ते पोहचले होते. शुक्रवारी या कार्यक्रमाचा तिसरा दिवस होता. महेंद्रगडमधील सीमहा गावात हा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरु असताना अचानक जनता त्यांच्या मागणीसाठी आग्रही झाली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. एका घरात मुख्यमंत्र्यांना थांबावे लागले. चार तास झाले तरी त्यांची सुटका होईना. त्याचवेळी लोकांची घोषणाबाजी सुरु होती. सीएम यांना बाहेर काढण्यासाठी आलेल्या आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांना लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

काय होती मागणी
आता हे सर्व ओलिस नाट्य ज्यामुळे घडलं. त्यामागचं कारण समजून घेऊयात. सीमहा गावाला उपतहसीलचा दर्जा देण्याची अनेक दिवसांपासूनची गावकऱ्यांची मागणी होती. पण शासन दरबारी या मागणीकडे दुर्लक्ष झाले. लोकांच्या मनात याविषयीचा राग होता. मुख्यमंत्री आल्यानंतर हा राग एकदम बाहेर आला. मुख्यमंत्र्यांनी हा मागणी मान्य केली. सीमहा गावाला उप तहसील कार्यालय आणि दर्जा देण्याची घोषणा करण्यात आली. तेव्हा कुठे या पेचप्रसंगातून मुख्यमंत्री महोदयांची सूटका झाली.

मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणीच नाही
विरोध वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या लोकांना शांततेचे आवाहन केले. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हा या गावात उपतहसील करण्याची मागणी त्यांच्यापर्यंत पोहचलीच नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याविषयी सर्वेक्षण करुन योग्य ठिकाणी उप तहसील करण्याचे आश्वासन दिले.