सिक्कीममध्ये हाहाकार, सात जणांचा मृत्यू, 150 जण अडकले, सैन्याकडून शोध मोहिम सुरु

| Updated on: Apr 04, 2023 | 8:23 PM

सिक्कीममध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 150 पेक्षा जास्त जण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. बचाव पथकाकडून बेपत्ता नागरिकांना शोधण्याचं काम सुरु आहे.

सिक्कीममध्ये हाहाकार, सात जणांचा मृत्यू, 150 जण अडकले, सैन्याकडून शोध मोहिम सुरु
Follow us on

गैंगटेक (सिक्कीम) : सिक्कीमध्ये (Sikkim)  मोठं नैसर्गिक संकट कोसळलं आहे. या संकटामुळे हाहाकार उडाला आहे. या संकटाविषयी शब्दांमध्ये सांगता येणार नाही इतकं भयानक हे संकट आहे. आकाशातून बर्फवृष्टी होतेय. प्रचंड हिमवादळ सुरु आहे. असं असताना अचानक हिमस्खलन (Avalanche) झालं. त्यामुळे प्रचंड मोठा हाहाकार उडाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 पेक्षा जास्त जण अडकल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सैन्य, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचाव कार्य सुरु आहे. एका प्रसिद्ध अशा प्रेक्षणीय स्थळी हिमस्खलन झालंय. या ठिकाणी अनेक प्रवासी अडकले आहेत.

संबंधित घटना ही पूर्व सिक्कीममधील नाथुला येथील त्सोमगो झील परिसरात घडली आहे. या घटनेत आता पर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतकांमध्ये पाच पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. तर एक लहान मुलगा आहे. संबंधित हिमस्खलनाची घटना ही दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी घडली. सिक्कीम पोलीस, सिक्कीमचे ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि अनेक वाहनांचे चालक बचाव कार्यात गुंतले आहेत. त्याचबरोबर भारतीय सैन्याकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधित घटना 15 व्या माईलस्टोनवर घडली आहे. खरंतर फक्त 13 व्या माईलस्टोनपर्यंत जाण्याची परवानगी आहे. पण पर्यटक ऐकत नाहीत. ते जबरदस्ती 15 व्या माईलस्टोनपर्यंत जातात, अशी माहिती चेकपोस्टचे इंस्पेक्टर जनरल सोनम तेनजिंद भूटिया यांनी सांगितलं.


भारत-चीन सीमेवरील नाथुला येथे हिमस्खलन झालंय. सिक्कीममध्ये अजूनही बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे पर्यटकांना 13 व्या माईलस्टोनपर्यंत जाण्याची मर्यादा आखून दिली होती. या दरम्यान अनपेक्षित घटना घडली. तसेच हिमवादळानंतर रस्त्यावर तब्बल 350 जण आणि जवळपास 80 वाहनं फसले आहेत.