लेक काहीबाही बोलली… मुंख्यमंत्र्यांनी थेट मंत्र्याला हाकललं, तेलंगणाच्या राजकारणात खळबळ
Konda Surekha : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि वनमंत्री कोंडा सुरेखा यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तेलंगणाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि वनमंत्री कोंडा सुरेखा यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात राज्यपाल शिव प्रताप शुक्ल यांच्याकडे शिफारस पाठवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने निवेदनातून दिली आहे. कोंडा सुरेखा यांच्या मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांविरोधात केलेल्या कथित टीकेनंतर वाद सुरू झाला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोंडा सुरेखा यांचा मंत्रिपदावरून हटवल्याच्या वृत्ताचे खंडन
कोंडा सुरेखा यांनी आपल्याला मंत्रिमंडळातून हटवण्यात आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. याबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरेखा म्हणाल्या की, ‘मला अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. ना स्वाक्षरी आहे, ना लेटरहेड, फक्त साधा कागद आहे. मला वाटते हे योग्य नाही. मला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.’ आपल्याला हटवण्याची पद्धत योग्य नसल्याचा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आधी पक्षाने आमची बाजू ऐकून घ्यायला हवी होती
कोंडा सुरेखा यांनी सांगितले की, पक्षाने बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीला त्यांनी उत्तर दिले आहे. मात्र, मुलीच्या वक्तव्याच्या प्रकरणात आपली बाजू योग्य पद्धतीने ऐकून घेतली गेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. ‘पक्षाकडून कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही,’ असे सुरेखा यांनी म्हटले. शिस्तभंगाची कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आपली बाजू ऐकून घेणे आवश्यक होते, असा युक्तिवादही त्यांनी केला.
पुढे काय करणार?
कोडा सुरेखा यांनी पुढील कार्यवाहीवर बोलताना म्हटले की, अधिकृत पुष्टी मिळाल्यानंतर पुढील कारवाई काय करायची, हे मी ठरवेन. तसेच त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत बोलताना सुरेखा म्हणाल्या, ‘मी कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही आणि कोणतीही टिप्पणीही केलेली नाही.’
कोंडा सुरेखा यांच्या मुलीने काय म्हटले होते?
कोंडा सुरेखा यांच्या मुलगी कोंडा सुष्मिता पटेल यांनी वारंगल येथे एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे तेलुगू देसम पक्ष (TDP) आणि भारत राष्ट्र समिती (BRS) मधून काँग्रेसमध्ये आलेल्या नेत्यांना अधिक महत्त्व देत असल्याचा आरोप त्यांनी केला. जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडे आणि निष्ठावान नेत्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांनी म्हटले. या वक्तव्यांनंतर तेलंगणा काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आणि आता कोंडा सुरेखा यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे.