
लखनौ : अख्या जगावार आपली दहशत माजवणाऱ्या कोरोनाने काही काळ विश्रांती घेतली होती. तो आता पुन्हा आपले पाय पसरत आहे. याचे उदाहरण म्हणजे चीन (china).येथे कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. तर मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. त्यामुळे चीनची आर्थिक राजधानी आणि सगळ्यात मोठे शहर असणाऱ्या शांघाई (Shanghai) शहरात लॉडाऊन करण्यात आला आहे. यादरम्यान देशाचीही चिंता वाढवणारी बातमी आली आहे. देशात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत असून गेल्या 24 तासांत, कोरोनाचे 2,183 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 214 रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वात भयावह आकडेवारी दिल्ली-एनसीआरमधून समोर येत असून दिल्ली-नोएडामध्ये देशातील प्रत्येक चौथा कोरोनाचा रुग्ण समोर येत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने काही महत्वाचे निर्णय घेताना पुन्हा मास्क सक्ती केली आहे. तसेच राजधानी लखनौ आणि एनसीआरच्या सहा जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क (Mask) घालणे अनिवार्य केले आहे.
कोविडच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचा परिणाम राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR)अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांवर झाला आहे. एका सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, हे लक्षात घेऊन सरकारने गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत आणि राजधानी लखनऊमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत गौतम बुद्ध नगरमध्ये 65, गाझियाबादमध्ये 20 आणि लखनऊमध्ये 10 नवीन बाधीत समोर आले आहेत.
कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीतील सुधारणा लक्षात घेता, उत्तर प्रदेश सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला फेस मास्क घालण्यास सूट दिली होती. पण आता अनेक जिल्ह्यांमध्ये फेस मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. अलीकडेच दिल्ली सरकारने लोकांना मास्कपासून सूट दिली होती. मात्र त्यानंतर दिल्लीत कोरोना बाधीतांच्या संख्येत अचानक वाढ झाली असून संसर्गाचे प्रमाणही वाढले आहे.
रविवारी दिल्लीत कोविड-19 चे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. संसर्ग दर 4.21 टक्के नोंदवला गेला आहे. रविवारी आलेल्या नवीन प्रकरणांसह, राष्ट्रीय राजधानीत आतापर्यंत एकूण 18,68,550 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आणि संसर्गामुळे 26,160 लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. शनिवारी, राष्ट्रीय राजधानीत कोविड -19 चे 461 नवीन रुग्ण आढळले, तर 2 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.